देशात सुरू असलेला लोकशाहीचा उत्सव आता अंतिम टप्प्यात असून आता केवळ एकाच टप्प्यातील मतदान राहिले आहे. १ जून रोजी सातव्या टप्प्याचे मतदान पार पडल्यानंतर ४ जून रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या निकालाकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे. एकीकडे भाजपाकडून ४०० पारचा नारा दिलेला असताना या निवडणुकीत एनडीएचा विजय होईल, असा विश्वास भाजपा नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे. निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात प्रचार कामाला वेग आलेला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही काही माध्यमांना मुलाखती दिल्या आहेत.
एका माध्यमाशी बोलताना त्यांना निवडणूक निकालाच्या दिवशी ते काय करतात? म्हणजेच त्यांची दिनचर्या नेमकी कशी असते? यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. यावर नरेंद्र मोदी यांनी भाष्य केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एबीपी न्यूज’ला मुलाखत देताना या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. नरेंद्र मोदी म्हणाले की, दुपारी दोन वाजेपर्यंत निकालाकडे ते बघतही नाहीत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
“निकालाच्या दिवशी मी सहसा निवडणुकीसंदर्भातील गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. सकाळी उठून मी नेहमी पेक्षा जास्त वेळ ध्यान करतो. निकालाच्या दिवशी कोणालाही माझ्या खोलीमध्ये प्रवेश करण्याची परवानगी नसते. त्यादिवशी मी फोन घेत नाही. मात्र, काही महत्त्वाचं काम असल्यास तो फोन घेतला जातो,” अशी माहिती नरेंद्र मोदी यांनी दिली. शिवाय त्यांनी पुढे बोलताना २००२ साली मुख्यमंत्री असतानाचा एक प्रसंगही सांगितला.
हे ही वाचा:
पीएफआयचे माजी प्रमुख ई अबुबकर यांचा जामीनअर्ज फेटाळला!
उत्तर भारतात उष्म्याचा कहर; दिल्लीत तापमान ५० अंश सेल्सिअसजवळ!
राजकोट गेमिंग झोनमधील आगीत मालकाचाही मृत्यू!
‘पाकिस्तानने भारताशी केलेल्या १९९९च्या लाहोर कराराचे उल्लंघन केले’
२००२ सालची एक आठवण सांगताना ते म्हणाले की, “मी २००१ साली मुख्यमंत्री झालो आणि २००२ साली गुजरातमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत्या. त्यावेळच्या निवडणूक आयोगाकडून मला सातत्याने त्रास दिला जात होता. माझ्यापुढे अनेक समस्या होत्या. त्यामुळे या निवडणुकीत भाजपाचा पराभव होईल, असे अनेकांना वाटत होते. त्या निकालाच्या दिवशी मी फोन बंद करुन ठेवला होता. माझ्या खोलीत एकटा होते. दुपारी एक वाजताच्या सुमारास माझ्या घरासमोर ढोल ताशे वाजायला सुरुवात झाली. त्यावेळी दुपारी मला निकालाचा अंदाज आला,” अशी आठवण नरेंद्र मोदींनी मुलाखत देताना सांगितली.







