२००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात मुंबईतील एक विशेष न्यायालय गुरुवारी (३१ जुलै) आपला बहुप्रतिक्षित निकाल दिला. या प्रकरणातील सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सबळ पुरावे नसल्याने कोर्टाने आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. ‘आरोपींविरुद्ध ठोस पुरावे नाहीत, संशयाच्या आधारे दोषी ठरवता येत नाही,’ असे न्यायालयाने म्हटले आहे.
या प्रकरणाचा निकला देताना न्यायालयाने काही मुद्दे उपस्थित केले. कोर्टाने म्हटले, पंचनामा करण्यात त्रुटी आढळून आल्या. सुरवातीला एटीएस आणि नंतर एनआयएने तपास केला. या प्रकरणातील आरोपींविरुद्ध ठोस पुरावे आढळले नाहीत. सुरवातीला मकोका अंतर्गत काही कलमे लावण्यात आलीत, त्यानंतर ती काढून टाकण्यात आलीत. यानंतर युएपीए कायद्यांतर्गत पुढे तपास सुरु राहिला मात्र इथे युएपीए लागू होत नसल्याचे कोर्टाने म्हटले. कोर्टाने म्हटले, संशयाचा फायदा घेत यांना अटक करण्यात आली होती. सबळ पुरावे नसल्याचे सांगत कोर्टाने सर्व सातही आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
या प्रकरणात स्कूटरचा विषय होता, स्कूटरमध्ये स्फोट झाला हे सांगण्यात आले होते. स्कूटरच्या मालकाशी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे संपर्क असल्याचे सांगितले जात होते. मात्र, तसे ठोस पुरावे एटीएसने दिले ना एनआयएने दिले. या प्रकरणाच्या पंचनाम्यात त्रुटी आढळून आल्याचे मुंबईत एनआयए विशेष कोर्टाने नमूद केले.
त्यानुसार कोर्टाने १७ वर्षांनंतर, न्यायालयाने भाजपच्या माजी खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितसह रमेश उपाध्याय, सुधाकर चतुर्वेदी, अजय राहिरकर, सुधाकर धर द्विवेदी उर्फ शंकराचार्य आणि समीर कुलकर्णी या सर्वांची निर्दोष मुक्तता केली आहे.
दरम्यान, २९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगाव येथील भिकू चौकात हा स्फोट झाला होता. या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होता आणि १०१ जण जखमी झाले होते.







