महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकांमध्ये महायुतीने एकहाती वर्चस्व प्रस्थापित केले आहे. १७ जागांपैकी सहा जागा यापूर्वीच बिनविरोध जिंकलेल्या महायुतीने उर्वरित ११ पैकी १० जागांवर विजय मिळवत आपले राजकीय वर्चस्व अधोरेखित केले. नाशिकमध्ये मात्र अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव करत मोठी उलथापालथ घडवून आणली. या निवडणुकीत महाविकास आघाडीला अनेक मतदारसंघांत धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला. अनेक ठिकाणी मतांचे विभाजन झाल्याचे निकालांवरून स्पष्ट झाले.
नागपूरमध्ये भाजपचे डॉ. राजीव पोतदार यांनी काँग्रेसचे अतुल लोंढे यांचा ५५२ मतांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. पोतदार यांना ६८२, तर लोंढे यांना १३० मते मिळाली. काँग्रेसच्या संख्याबळाच्या तुलनेत पक्षाची मते फुटल्याची चर्चा या निकालानंतर रंगली आहे. धाराशिव-बीड-लातूर मतदारसंघात भाजपचे बसवराज पाटील यांनी काँग्रेसचे महेश देशमुख यांचा तब्बल ७२१ मतांनी पराभव केला. पाटील यांना ८४५, तर देशमुख यांना १२४ मते मिळाली. हा राज्यातील सर्वाधिक मताधिक्याचा विजय ठरला.
सांगली-सातारा मतदारसंघातील चुरशीच्या लढतीत भाजपचे धैर्यशील कदम यांनी महाविकास आघाडीचे अभयसिंह जगताप यांचा ३०१ मतांनी पराभव केला. कदम यांना ५९३, तर जगताप यांना २९२ मते मिळाली. जळगावमध्ये भाजपचे नंदकिशोर महाजन यांनी महाविकास आघाडीचे शरद तायडे यांचा एकतर्फी पराभव केला. महाजन यांना ५७७ हून अधिक मते मिळाली, तर तायडे यांना केवळ ५ मतांवर समाधान मानावे लागले.
छत्रपती संभाजीनगर-जालना मतदारसंघात भाजपचे सुहास शिरसाठ यांनी पहिल्या पसंतीच्या ४५५ मतांसह विजय मिळवला. ठाकरे गटाचे गणेश लोखंडे यांना १३५ मते मिळाली. सोलापूरमध्ये भाजपचे राजेंद्र राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे वसंतराव देशमुख यांचा ३६५ मतांनी पराभव केला. राऊत यांना ४८३, तर देशमुख यांना ११८ मते मिळाली. नांदेडमध्ये भाजपचे अमरनाथ राजूरकर यांनी विजयाची हॅट्ट्रिक साधली. त्यांना ३३९ मते मिळाली, तर महाविकास आघाडीच्या कृष्णा पाटील आष्टीकर यांना ८४ मते मिळाली.
भंडारा-गोंदिया मतदारसंघात भाजपचे अविनाश ब्राह्मणकर यांनी काँग्रेस समर्थित अपक्ष उमेदवार नरेश ईश्वरकर यांचा १४८ मतांनी पराभव केला. ब्राह्मणकर यांना ३०४, तर ईश्वरकर यांना १५२ मते मिळाली. परभणी-हिंगोलीमध्ये शिवसेना (शिंदे गट) महायुतीचे उमेदवार सईद खान यांनी पहिल्या पसंतीच्या मतांच्या जोरावर विजय मिळवला. त्यांनी महाविकास आघाडीचे विवेक नवंदर यांचा पराभव केला. अमरावतीमध्ये भाजपचे माजी मंत्री प्रवीण पोटे यांनी दणदणीत विजय मिळवला. पोटे यांना ३९० मते मिळाली. विशेष म्हणजे काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख यांना एकही मत मिळाले नाही, तर वंचित बहुजन आघाडीचे निलेश विश्वकर्मा यांना ३१ मते मिळाली. नाशिकमध्ये मात्र महायुतीला धक्का बसला. अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी ३५७ मते मिळवत महायुतीचे नरेंद्र दराडे (२४८ मते) यांचा पराभव केला.
हे ही वाचा:
शेअर बाजारात तेजी; आयटी, ऑइल-गॅस क्षेत्राची आघाडी
काश्मीर दौऱ्यावरून थरूर विरुद्ध काँग्रेस संघर्ष पेटला; काँग्रेसकडून टीका
कतारच्या रास लाफान एलएनजी प्रकल्पात भीषण स्फोट; ५४ जखमी
पाणी अडवल्यास युद्ध! पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांची भारताला धमकी
दरम्यान, पुणे, अहिल्यानगर, ठाणे, कोकण, यवतमाळ आणि वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर या सहा मतदारसंघांमध्ये उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आले होते. यामध्ये विक्रम काकडे, प्राजक्त तनपुरे, रवींद्र फाटक, अनिकेत तटकरे, दुष्यंत चतुर्वेदी आणि अरुण लखाणी यांचा समावेश आहे. या निकालामुळे राज्यात महायुतीची संघटनात्मक ताकद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रभाव पुन्हा एकदा अधोरेखित झाला असून, महाविकास आघाडीसमोर आत्मपरीक्षणाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.







