गडचिरोलीत पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत ५० लाखांचे इनाम असलेला कुख्यात नक्षलवादी आणि माओवादी मिलिंद तेलतुंबडे याचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले आहे. मिलिंद तेलतुंबडे हा भीमा कोरेगाव प्रकरणातला आरोपी आनंद तेलतुंबडेचा भाऊ आहे.
मिलींद तेलतुंबडे हा नक्षली कमांडर होता. त्याला ठार करणे हे महाराष्ट्र पोलिसांचे मोठे यश मानले जाते आहे. त्यामुळे आता नक्षली चळवळीला उद्ध्वस्त करण्याच्या दिशेने हे पोलिसांचे मोठे पाऊल मानले जाते आहे.
इंजीनिअरिंगचे शिक्षण घेतल्यानंतरही मिलिंद तेलतुंबडे नक्षलवादाकडे वळला. त्याने वेकोलीत नोकरी केली आहे. तो नंतर आयटक युनियन मध्ये सामील झाला. जनरल सेक्रेटरी म्हणूनही त्याच्याकडे जबाबदारी होती. नंतर तो नक्षल चळवळीत सक्रिय झाला.
गडचिरोलीमध्ये शनिवारी झालेल्या चकमकीत पोलिसांनी २६ नक्षलवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान घातले. लाखोंची इनामे असलेल्या या नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश मिळाले.
मिलींद तेलतुंबडे हा वणीपासून जवळच असलेल्या राजूर (इजारा) येथील रहिवासी होता. त्याचे घरगुती नाव अनिल आहे तर शैक्षणिक दस्तावेजातील नांव मिलिंद असे असल्याचे कळते. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले असून महाविद्यालयीन शिक्षण वणीत झाले. नोकरी सोडून तो नक्षलवादी चळवळीत सामील झाला. त्यानंतर तो १९९६ पासून वणीत परतला नाही. त्याची पत्नी प्राध्यापक असून चंद्रपूर येथे वास्तव्यास आहे. तो लेखक, प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांचा भाऊ. त्याने भाकप माओवादी पक्षाचा महाराष्ट्र सचिव म्हणूनही काम केलं आहे. नक्षली नेत्यांमधल्या सर्वात वरिष्ठ नेत्यांपैकी तो एक होता. दलित सेंट्रल कमिटीचा पहिला दलित सदस्य होता.
हे ही वाचा:
‘महाआघाडी आणि रझा अकादमीच्या नेत्यांना ठाकरे पवार सरकारकडून अटक का नाही?
कुणाकडून लाच तर घेतली गेली नाही ना, पंतप्रधानांनी विचारला प्रश्न…काय आहे प्रकरण?
आता मोबाईलवरून साजरा करा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
त्रिपुरात कोणत्याही मशीदिची तोडफोड, नुकसान झालेच नाही
मध्यंतरी राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात सुरजागड खाणी विरोधात आंदोलनाबाबत टीका करणारे पत्र व्हायरल झाले होते. त्यात नक्षल्यांचा प्रवक्ता म्हणून श्रीनिवासची सही होती, पण ते पत्र मिलिंद तेलतुंबडेने लिहिल्याचं समोर आलं होतं.