भारताची जागतिक डिजिटल क्षेत्रातील भूमिका नव्याने परिभाषित करण्याच्या धाडसी प्रयत्नात, केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अंदमान-निकोबार बेटांना आंतरराष्ट्रीय इंटरनेट डेटा ट्रान्स्फरचे प्रमुख केंद्र बनवण्याचा प्रस्ताव मांडला आहे.
हा प्रस्ताव आज गूगलच्या “भारत AI शक्ती” या कार्यक्रमात सादर करण्यात आला, ज्यामध्ये बेटसमूहाच्या बंगालच्या उपसागरातील धोरणात्मक स्थानाचा उपयोग करून सिंगापूरसारख्या प्रचंड भारित डेटा हबवरील दबाव कमी करण्याचा आणि दक्षिणपूर्व आशिया, ऑस्ट्रेलिया व इतर भागांशी नव्या डेटा मार्गांची निर्मिती करण्याचा हेतू आहे.
गूगलचा ऐतिहासिक गुंतवणूक निर्णय
ही घोषणा त्या पार्श्वभूमीवर करण्यात आली, जेव्हा गुगलने २०२६ ते २०३० या कालावधीत तब्बल १५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा केली. अमेरिकेबाहेरील त्यांचा सर्वात मोठा एआय हब भारतातील विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश) येथे उभारला जाणार आहे. ही गूगलची भारतासाठी आतापर्यंतची सर्वात मोठी वचनबद्धता मानली जात आहे.
वैष्णव यांची महत्त्वाकांक्षी दृष्टी
या कार्यक्रमात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू आणि गूगल क्लाऊड सीईओ थॉमस कुरियन उपस्थित होते.
वैष्णव म्हणाले, “अंदमान-निकोबार बेटे भौगोलिकदृष्ट्या अत्यंत धोरणात्मक ठिकाणी आहेत. सिंगापूर आधीच ओव्हरलोड झाले आहे. मग अंदमानला पुढील मोठे ग्लोबल डेटा हब का बनवू नये? भारत सरकारकडून या उपक्रमासाठी पूर्ण पाठबळ दिले जाईल. ही बेटे गूगलसह इतर इंटरनेट-आधारित संस्थांना दक्षिणपूर्व आशिया, ऑस्ट्रेलिया आणि इतर भागांशी नव्या डेटा क्षमतेने जोडण्यास मदत करू शकतात.”
ईशान्य भारतासाठी “वायझॅग-सित्तवे केबल लिंक”
वैष्णव यांनी ईशान्य भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधांच्या बळकटीसाठी विशाखापट्टणम ते म्यानमारमधील सित्तवे दरम्यान समुद्राखालील केबल लिंक उभारण्याचा प्रस्ताव मांडला.ही लिंक RailTel नेटवर्क आणि म्यानमार सीमेकडे वाढणाऱ्या रेल्वे विस्तार प्रकल्पांशी जोडली जाईल. मिझोराममधील सैरांगपर्यंतचा मार्ग आधीच तयार झाला असून, या विस्तारामुळे ईशान्येकडील दुर्गम राज्यांना हाय-स्पीड इंटरनेट प्रवेश मिळेल.
हे ही वाचा:
बाबासाहेब पाटील यांनी गोंदियाचे पालकमंत्रीपद सोडलं!
बॉलीवूड अभिनेता अमिताभ बच्चनवरही ‘लाबूबू’ क्रेज
गोपनीय कागदपत्रे बाळगल्याप्रकरणी अटकेत असलेले एशले टेलिस कोण आहेत?
सिल्क रुटचे पुनरुज्जीवन होणार; भारताची वखान कॉरीडोअरवर नजर
विशाखापट्टणम – नवे डिजिटल केंद्र
विशाखापट्टणममध्ये उभारण्यात येणारा AI हब AdaniConneX आणि Airtel यांच्या भागीदारीत विकसित होणार आहे.
हा प्रकल्प गिगावॅट क्षमतेच्या डेटा सेंटर कॅम्पससह अत्याधुनिक AI इन्फ्रास्ट्रक्चर, फायबर-ऑप्टिक नेटवर्क, स्वच्छ उर्जानिर्मिती आणि संचयन प्रणालींचा समावेश करतो.
हा हब गूगल सर्च, वर्कस्पेस आणि यूट्युब सारख्या सेवांना चालना देईल, तसेच मेक माय ट्रिप, मिशो, टीसीएस आणि कोरोव्हर, ग्लान्स, इनव्हीडिओ एआय, सर्वम सारख्या स्टार्टअप्सना सहाय्य करेल. थॉमस कुरियन यांच्या मते, हा प्रकल्प “भारताच्या डिजिटल भविष्यासाठी ऐतिहासिक गुंतवणूक” आहे — ज्यामुळे वेगवान नवोन्मेष आणि सर्वसमावेशक वाढ साध्य होईल.
“गेम-चेंजर” – वैष्णव
मंत्री वैष्णव यांनी या AI हबचे वर्णन “भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेसाठी गेम-चेंजर” असे केले. “ही पायाभूत सुविधा केवळ AI-आधारित सेवांचा नवा युगप्रारंभ करणार नाही, तर उच्च मूल्याच्या नोकऱ्या आणि आर्थिक संधी निर्माण करेल,”
असे ते म्हणाले. त्यांनी गूगलला आयटी व्यावसायिकांच्या पुनर्प्रशिक्षणाला प्राधान्य देण्याचे आणि एनव्हीडीए च्या GPUला स्पर्धा देणारे गूगल टेन्सर प्रोसेसिंग युनिट (TPUs) भारतात आणण्याचे आवाहन केले — ज्यामुळे AI क्षेत्रात तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या दारे उघडतील.
आंध्र सरकारचा उत्साह
मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या गुंतवणुकीला “भारताच्या डिजिटल परिवर्तनाचा नवा अध्याय” म्हटले. त्यांच्या मते, विशाखापट्टणम AI स्वीकार आणि स्टार्टअप नवप्रवर्तनाचे नवे केंद्र बनणार आहे. या हबचा भर नवीन उर्जेच्या वापरावर आहे — जे गूगलच्या 2030 पर्यंत नेट-झिरो उत्सर्जनाच्या उद्दिष्टांशी सुसंगत आहे. यामुळे वीजग्रिडची स्थिरता वाढेल, तसेच गूगलच्या संपूर्ण AI स्टॅकचा वापर संशोधन, उद्योग आणि विकास क्षेत्रात कमी विलंबाने करता येईल.
“विकसित भारत २०४७” शी जोडलेली दिशा
ही भौगोलिक, धोरणात्मक आणि खाजगी गुंतवणुकीची सांगड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “विकसित भारत २०४७” दृष्टीशी सुसंगत आहे. ही योजना डिजिटल इंडिया मोहिमेला नवी गती देत शहरी–ग्रामीण दरी कमी करेल आणि भारताला जागतिक AI महासत्ता बनवेल.







