पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर होर्मुझ सामुद्रधुनीतून सुरक्षित मार्ग मिळाल्यानंतर भारताकडे येणारे पहिले तेलवाहू जहाज मुंबईच्या दिशेने पोहोचले आहे. मध्यपूर्वेतील संघर्षामुळे काही दिवसांपासून या महत्त्वाच्या समुद्री मार्गावरून जहाजांची वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती. अशा परिस्थितीत भारतासाठी ही महत्त्वाची दिलासादायक घडामोड मानली जात आहे. माहितीनुसार, सौदी अरेबियातून कच्चे तेल घेऊन आलेले “शेनलाँग” (Shenlong) नावाचे तेलवाहू जहाज होर्मुझ सामुद्रधुनी पार करून सुरक्षितपणे मुंबई बंदराच्या दिशेने आले. हे जहाज लायबेरिया ध्वजाखाली नोंदणीकृत असले तरी त्याचे कॅप्टन भारतीय आहेत. मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक जहाजांनी या मार्गाने जाणे टाळले होते, त्यामुळे या जहाजाचे आगमन विशेष महत्त्वाचे ठरत आहे.
हे ही वाचा:
अतुल भातखळकरांची वचनपूर्ती; लोखंडवाला, गोरेगाव ते मागाठाणे डीपी रोड दोन वर्षांत!
होर्मुझ सामुद्रधुनी भारतीय तेलवाहू जहाजांना खुली!
ट्रान्सपॉन्डर, स्वयंचलित प्रणाली बंद… होर्मुझ सामुद्रधुनी पार करत तेलवाहू जहाज मुंबईत!
‘टॅरिफ चौकशी’मुळे भारत, चीनसह १६ अमेरिकन व्यापारी भागीदारांना फटका
होर्मुझ सामुद्रधुनी ही जगातील सर्वात महत्त्वाच्या तेलवाहतूक मार्गांपैकी एक मानली जाते. जगातील सुमारे २० टक्के कच्च्या तेलाची वाहतूक या मार्गाने होते. त्यामुळे येथे निर्माण झालेला कोणताही तणाव जागतिक ऊर्जा बाजारावर थेट परिणाम करतो. अलीकडे अमेरिके-इस्रायल आणि इराणमधील संघर्षामुळे या मार्गावरील जहाजवाहतुकीत मोठी घट झाली होती.
दरम्यान, भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांशी दूरध्वनीवर चर्चा केल्यानंतर इराणने भारतीय जहाजांना सुरक्षित मार्ग देण्यास सहमती दर्शवली. या चर्चेनंतर भारताशी संबंधित जहाजांना होर्मुझ सामुद्रधुनीतून जाण्याची परवानगी देण्यात आली, असे सूत्रांनी सांगितले.
या आधी या भागात काही तेलवाहू जहाजांवर हल्ले झाल्याच्या घटना घडल्या होत्या, त्यामुळे अनेक आंतरराष्ट्रीय शिपिंग कंपन्यांनी जहाजे थांबवली होती. काही जहाजांनी तर धोका टाळण्यासाठी मार्ग बदलण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे जागतिक तेलपुरवठा आणि किमतींवरही त्याचा परिणाम दिसून आला.
भारतासाठी ही परिस्थिती अत्यंत महत्त्वाची आहे कारण देशाच्या मोठ्या प्रमाणातील तेल आयातीसाठी मध्यपूर्वेतील मार्गांवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे होर्मुझ सामुद्रधुनी सुरक्षित राहणे भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी अत्यावश्यक आहे.
या पार्श्वभूमीवर मुंबईकडे पोहोचलेले हे पहिले तेलवाहू जहाज भारतासाठी दिलासादायक मानले जात असून, पुढील काळात आणखी जहाजांना सुरक्षित मार्ग मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.







