भारतीय वंशाचे नागरिक आणि कामगार जगभरात आपली छाप सोडत असतानाच भारताने आणखी एक मोठा आर्थिक विक्रम केला आहे. २०२४ मध्ये परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी भारतात तब्बल १३७ अब्ज डॉलरपेक्षा अधिक रक्कम पाठवली असून, जगातील सर्वाधिक ‘रेमिटन्स’ मिळवणारा देश म्हणून भारताने पुन्हा अव्वल स्थान कायम ठेवले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक स्थलांतर अहवालात ही माहिती समोर आली आहे.
भारताबाहेर राहणाऱ्या भारतीयांची संख्या सध्या सुमारे १ कोटी ९० लाख इतकी आहे. संयुक्त अरब अमिराती, अमेरिका, सौदी अरेबिया, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि युरोपमधील अनेक देशांमध्ये भारतीय मोठ्या प्रमाणावर काम करत आहेत. हेच भारतीय दरवर्षी आपल्या कुटुंबीयांना, गुंतवणुकीसाठी आणि विविध गरजांसाठी मोठ्या प्रमाणावर पैसा भारतात पाठवतात.
हे ही वाचा:
होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिका- इराणमध्ये गोळीबार
ऍपल भारतातील नवीकरणीय ऊर्जा पायाभूत सुविधांमध्ये करणार १०० कोटींची गुंतवणूक
कॉर्पोरेट जिहाद प्रकरणी आरोपी निदा खान सापडली!
कलिंगडामुळे नाही, तर उंदीर मारण्याच्या औषधामुळे झाला त्या चौघांचा मृत्यू
विशेष म्हणजे, १०० अब्ज डॉलरचा टप्पा पार करणारा भारत हा जगातील एकमेव देश ठरला आहे. २०१० मध्ये भारताला सुमारे ५३ अब्ज डॉलर इतकी रेमिटन्स मिळाली होती. त्यानंतर २०१५ मध्ये ही रक्कम ६८ अब्ज डॉलरवर पोहोचली, तर २०२० मध्ये ती ८३ अब्ज डॉलर झाली. आता २०२४ मध्ये हा आकडा थेट १३७ अब्ज डॉलरवर गेला आहे. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा आधार मिळत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
रेमिटन्स म्हणजे परदेशात राहणाऱ्या नागरिकांनी आपल्या देशात पाठवलेला पैसा. भारतातील लाखो कुटुंबांचे शिक्षण, आरोग्य, घरखर्च आणि व्यवसाय या पैशांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत. ग्रामीण भागातील अर्थचक्रालाही यामुळे गती मिळते. अनेक कुटुंबांसाठी हा पैसा आर्थिक स्थैर्याचा प्रमुख आधार ठरत आहे.
अमेरिका ही जगातील सर्वाधिक रक्कम पाठवणारी अर्थव्यवस्था ठरली असून, २०२४ मध्ये अमेरिकेतून १०० अब्ज डॉलरपेक्षा जास्त रक्कम विविध देशांमध्ये पाठवण्यात आली. त्यानंतर सौदी अरेबिया, स्वित्झर्लंड आणि जर्मनी यांचा क्रमांक लागतो. भारताकडे येणाऱ्या रेमिटन्समध्ये गल्फ देशांचा मोठा वाटा असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, भारतीय विद्यार्थ्यांचे परदेशातील प्रमाणही झपाट्याने वाढत आहे. ६.२ लाखांहून अधिक भारतीय विद्यार्थी परदेशात शिक्षण घेत असल्याचे अहवालात म्हटले आहे. भविष्यात हेच विद्यार्थी आणि व्यावसायिक जागतिक स्तरावर भारताची आर्थिक ताकद आणखी वाढवू शकतात.
तज्ज्ञांच्या मते, भारतीय डायस्पोराची वाढती ताकद, उच्च कौशल्य असलेले भारतीय व्यावसायिक आणि परदेशातील रोजगाराच्या वाढत्या संधी यामुळे भारताची रेमिटन्स क्षमता पुढील काही वर्षांत आणखी वाढू शकते. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी परदेशातील भारतीय हे मोठे आर्थिक बळ ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.







