देशात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर झपाट्याने वाढत असून, एप्रिल २०२६ मध्ये इलेक्ट्रिक वाहन विक्रीने मोठी उसळी घेतली आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशन (फाडा) यांच्या अहवालानुसार, देशातील इलेक्ट्रिक प्रवासी वाहनांच्या विक्रीत तब्बल ७५.१४ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. वाढत्या इंधनदरांचा दबाव, पर्यावरणपूरक पर्यायांची वाढती मागणी आणि चार्जिंग सुविधांचा विस्तार यामुळे ग्राहक आता इलेक्ट्रिक वाहनांकडे अधिक वेगाने वळताना दिसत आहेत.
एप्रिल महिन्यात देशभरात २३ हजार ५०६ इलेक्ट्रिक प्रवासी वाहनांची विक्री झाली. गेल्या वर्षी याच महिन्यात ही संख्या १३ हजार ४२१ इतकी होती. या वाढीत टाटा मोटर्सने पुन्हा एकदा आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. कंपनीने एप्रिलमध्ये ८ हजार ५४३ इलेक्ट्रिक कार विकल्या असून, त्यात वार्षिक आधारावर ७७ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. महिंद्रा अँड महिंद्रा ५ हजार ४१३ वाहनांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिली, तर जेएसडब्ल्यू एमजी मोटर इंडियाने ५ हजार ६ वाहनांची विक्री करत तिसरे स्थान मिळवले.
हे ही वाचा:
भारत-व्हिएतनाममध्ये २०३० पर्यंत २५ अब्ज डॉलर व्यापाराचे लक्ष्य
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएच्या हत्येत बनावट नंबर प्लेटच्या गाडीचा वापर
गोव्यात बागा-कलंगुट किनाऱ्यावर १७ अतिक्रमणे जमीनदोस्त
भारताच्या निर्यातीचा नवा विक्रम; ८६३ अब्ज डॉलरचा ऐतिहासिक टप्पा पार
इलेक्ट्रिक दुचाकी विभागातही मोठी तेजी दिसून आली. एप्रिलमध्ये १ लाख ४८ हजार ७४० इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा जवळपास ६१ टक्क्यांनी अधिक आहे. या विभागात टीव्हीएस मोटर कंपनीने ३७ हजार ६८३ वाहनांची विक्री करत अव्वल स्थान पटकावले. बजाज ऑटोने ३२ हजार ८९८ वाहनांची विक्री केली, तर एथर एनर्जीने २७ हजार ३४ वाहनांसह जोरदार कामगिरी केली. विशेष म्हणजे, एथरच्या विक्रीत शंभर टक्क्यांपेक्षा अधिक वाढ नोंदवण्यात आली आहे.
फाडाच्या अहवालानुसार, इलेक्ट्रिक वाहनांचा बाजार आता केवळ महानगरांपुरता मर्यादित राहिलेला नाही. ग्रामीण आणि निमशहरी भागातही ईव्ही वाहनांची मागणी वेगाने वाढत आहे. प्रवासी वाहनांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा हिस्सा आता ५.७७ टक्क्यांवर पोहोचला आहे. दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा स्वीकार राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक असल्याचेही समोर आले आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू ही राज्ये या बदलाचे प्रमुख केंद्र ठरत आहेत.
दरम्यान, इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहनांच्या विक्रीतही मोठी वाढ झाली आहे. एप्रिलमध्ये या विभागातील विक्री दुप्पट वाढून २ हजार २४५ वाहनांवर पोहोचली. सरकारकडून मिळणारे प्रोत्साहन, पीएम ई-ड्राइव्हसारख्या योजना आणि वाढती पर्यावरण जागरूकता यामुळे आगामी काळात भारतातील ईव्ही बाजार आणखी वेगाने वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.







