विदेशी मीडियातून सुरू असलेल्या नॅरेटिव्हची कायम भारताला भीती वाटत असते. कारण जागतिक दर्जाचा मीडिया हे असे घातक हत्यार आहे, जे भारताकडे नाही. ही ताकद युरोप आणि अमेरिकेकडे आहे, म्हणून ते अभिजित दिपके नावाचा ठिपकाही मोठा करून दाखवू शकतात. विकसित राष्ट्र म्हणून येत्या काही वर्षांत भारताकडे काय असायला हवे, याची यादी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लालकिल्ल्यावरून जाहीर केली. जगातील पाच बँकांपैकी एक बडी बँक, पाच बड्या रेटिंग कंपन्यांपैकी एक रेटिंग एजन्सी, जगातील पाच बड्या फार्मा कंपन्यांपैकी एक कंपनी, फॉर्च्यून ५०० कंपन्यांपैकी ५० कंपन्या भारतीय हव्या, असे मोदी म्हणाले. जागतिक नॅरेटिव्ह वॉर लढू शकेल अशा मीडिया नावाच्या घातक हत्याराशिवाय या सगळ्या गोष्टी निरर्थक आहेत. मीडियाचा एक हाच मजबूत नॅरेटिव्ह मोदी सरकारच्या १२ वर्षांतील अफाट मेहनतीवर पाणी ओतू शकतो. जागतिक प्रभाव असलेला मीडिया हा देशाच्या ताकदीचा एक महत्त्वाचा निकष आहे. हे कवच आहे आणि शस्त्रही. भारतातील कोणत्याही सरकारला जेव्हा जेव्हा चेपायचे असेल, तेव्हा अमेरिका आणि युरोपातील देश या शस्त्राचा वापर करत आलेले आहेत. गुजरात दंगलींपासून शंभर उदाहरणे देता येतील. रशियाकडून युरेनियम खरेदी करणारा अमेरिका, गॅस खरेदी करणारा युरोप रशियन तेल खरेदीच्या मुद्द्यावर भारताला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करू शकतो, त्याला बऱ्याच प्रमाणात मीडियाची ही ताकद आणि त्यातील दिमागी नक्षलवादी कारणीभूत आहेत. भारताला हे आजवर जमले नाही. आजच्या नॅरेटिव्ह वॉरच्या काळात एक शक्तिशाली जागतिक मीडिया ही भारताची गरज आहे. कतारसारख्या छोटेखानी देशाने अल जझीरा या नावाने जागतिक दर्जाचा मीडिया गेल्या २० वर्षांत उभा केला. भारताला ते अजून जमलेले नाही.



