आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये मुंबई पोर्ट प्राधिकरणाने (Mumbai Port Authority) ७५.१५ दशलक्ष मेट्रिक टन (MMT) मालवाहतूक हाताळणी करून आपल्या इतिहासातील सर्वोच्च कामगिरीची नोंद केली आहे. या यशामुळे देशातील सर्व प्रमुख बंदरांमधून हाताळल्या गेलेल्या एकूण मालवाहतुकीत मुंबई पोर्टचा ८.२२ टक्के वाटा झाला आहे. या यशानंतर आता प्राधिकरणाने ८० दशलक्ष मेट्रिक टन मालवाहतूक हाताळणीचे नवे लक्ष्य निश्चित केले आहे.
उल्लेखनीय कामगिरीचा आढावा घेण्यासाठी आणि भविष्यातील धोरणांवर चर्चा करण्यासाठी २२ मे रोजी मुंबई येथे मुंबई पोर्ट प्राधिकरणाने स्टेकहोल्डर बैठक आयोजित केली होती. या बैठकीत बंदर वापरकर्ते, टर्मिनल ऑपरेटर, व्यापार क्षेत्रातील प्रतिनिधी, उद्योगजगताशी संबंधित सदस्य आणि मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. एम. अंगमुथु यांनी यावेळी सांगितले की, “७५.१५ दशलक्ष मेट्रिक टन मालवाहतूक हाताळणीचा हा विक्रम बंदर वापरकर्ते, व्यापारी भागीदार तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध संस्थांच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित आहे. या यशात योगदान देणाऱ्या प्रत्येक व्यक्ती आणि हितधारकांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. बंदरातून हाताळला जाणारा प्रत्येक दशलक्ष टन माल महसूल निर्माण करतो, रोजगाराला चालना देतो आणि देशाच्या आर्थिक प्रगतीत थेट किंवा अप्रत्यक्षपणे योगदान देतो. मुंबई पोर्ट राष्ट्राच्या विकासासाठी एक सक्षम माध्यम म्हणून कार्य करत आहे आणि ही कामगिरी बंदराशी संबंधित सर्वांचीच आहे.”
बैठकीदरम्यान मुंबई पोर्टची कार्यपद्धती इतर बंदरांपेक्षा वेगळी असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. येथे मोठ्या प्रमाणावर मालवाहतूक ऑफशोअर आणि पूरक यंत्रणांच्या माध्यमातून हाताळली जाते. सादरीकरणात मालवाहतुकीतील वाढ, जहाज संचालन, जलद टर्नअराउंड टाइम, बर्थचा अधिक प्रभावी वापर आणि स्पर्धात्मक तसेच किफायतशीर बंदर संचालन यांसारख्या महत्त्वाच्या बाबींवर चर्चा करण्यात आली.
मुंबई पोर्टने लोखंड आणि पोलाद (Iron & Steel) आयात-निर्यात मालवाहतुकीत ३५ टक्के बाजारपेठेतील हिस्सा मिळवला आहे. तसेच द्रव बल्क (Liquid Bulk) कार्गोमध्ये १५.५ टक्के आणि किनारी व्यापारात (Coastal Trade) १०.४८ टक्के हिस्सा नोंदवला आहे. अधिकाऱ्यांच्या मते, ही आकडेवारी देशाच्या सागरी व्यापार क्षेत्रातील मुंबई पोर्टच्या मजबूत स्थानाचे द्योतक आहे.
हे ही वाचा:
पेट्रोल २.६१ रुपयांनी महागले तर, डिझेल २.७१ रुपयांनी झाले महाग
होर्मुझपासून ऊर्जा संकटापर्यंत…
इबोलावर WHO चा अलर्ट; भारताकडून ट्रॅव्हल अॅडव्हायझरी जारी
पाकिस्तानच्या क्वेटामध्ये स्फोटामुळे रेल्वेचे दोन डबे घसरले; मोठी जीवितहानी
बैठकीत भविष्यातील विविध प्रकल्पांवरही चर्चा झाली. यामध्ये प्रस्तावित मरीना विकास प्रकल्प विशेष चर्चेचा विषय ठरला. अध्यक्षांनी सांगितले की, भविष्यात मालवाहतूक क्षमता आणखी वाढवणे, पर्यावरणपूरक कार्गो हाताळणीला प्रोत्साहन देणे आणि भारताच्या सागरी विकासाला अधिक बळकटी देण्यासाठी सर्व हितधारकांसोबत समन्वयाने काम करण्याची गरज आहे. मुंबई पोर्ट प्राधिकरणाने स्पष्ट केले की, मुंबई आणि आसपासच्या प्रदेशातील सागरी व्यापार, मालवाहतूक आणि आर्थिक घडामोडींसाठी महत्त्वाचे केंद्र म्हणून आपली भूमिका भविष्यातही अधिक प्रभावीपणे पार पाडली जाईल.
