देशात सोलर क्रांतीचा झंझावात

२४ लाखांहून अधिक कुटुंबांना मोफत वीज, वीजबिल झाले शून्य

देशात सोलर क्रांतीचा झंझावात

देशात सौरऊर्जेची क्रांती वेगाने आकार घेत असून केंद्र सरकारच्या ‘पीएम सूर्य घर : मोफत वीज योजना’मुळे लाखो कुटुंबांच्या वीजबिलाचा भार कमी झाला आहे. अवघ्या काही महिन्यांत या योजनेअंतर्गत २४ लाखांहून अधिक घरांवर रूफटॉप सोलर प्रणाली बसवण्यात आली असून अनेक कुटुंबांचे मासिक वीजबिल अक्षरशः शून्यावर आले आहे. त्यामुळे सौरऊर्जा ही आता केवळ पर्यावरणपूरक ऊर्जा नसून सर्वसामान्यांसाठी आर्थिक बचतीचा प्रभावी पर्याय ठरत आहे.

केंद्र सरकारने फेब्रुवारी २०२४ मध्ये सुरू केलेल्या या योजनेअंतर्गत १ कोटी घरांवर सौर पॅनेल बसवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत या योजनेसाठी ५५ लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी २४ लाखांपेक्षा जास्त कुटुंबांनी सौरऊर्जा प्रणाली बसवली आहे. विशेष म्हणजे, सरकारकडून ३० हजार ते ७८ हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जात असल्याने मध्यमवर्गीय आणि ग्रामीण कुटुंबांनाही ही योजना परवडणारी ठरत आहे.
हे ही वाचा:
बदलापूरात BMW कारचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू

हॉकी महिला नेशन्स स्पर्धेत भारताने जिंकले विजेतेपद

आजपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन, शेतकरी, पाऊस प्रश्न महत्त्वाचे

‘सत्तेशिवाय विकासकामे होत नाहीत’
ऊर्जा मंत्रालयाच्या माहितीनुसार, रूफटॉप सोलर बसवलेल्या घरांना दरमहा सरासरी ३०० युनिटपर्यंत मोफत वीज मिळू शकते. त्यामुळे अनेक कुटुंबांची वर्षाला १५ हजार ते २५ हजार रुपयांपर्यंत बचत होत आहे. काही राज्यांमध्ये अतिरिक्त वीज ग्रीडला विकून नागरिकांना अतिरिक्त उत्पन्नही मिळत आहे. त्यामुळे ही योजना बचतीसोबत उत्पन्नाचे साधनही ठरत आहे.

सौरऊर्जेच्या वाढत्या वापरामुळे भारताची नवीकरणीय ऊर्जा क्षमता झपाट्याने वाढत आहे. देशाची एकूण सौरऊर्जा क्षमता ११० गिगावॅटपेक्षा अधिक झाली असून भारत जगातील आघाडीच्या सौरऊर्जा उत्पादक देशांमध्ये गणला जात आहे. सरकारचे उद्दिष्ट २०३० पर्यंत ५०० गिगावॅट नवीकरणीय ऊर्जा क्षमता निर्माण करण्याचे आहे, त्यामध्ये रूफटॉप सोलरची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

या योजनेमुळे देशांतर्गत सौर पॅनेल उत्पादन उद्योगालाही मोठी चालना मिळाली आहे. नव्या गुंतवणुकींसह हजारो रोजगार निर्माण होत असून ‘मेक इन इंडिया’ मोहिमेलाही बळ मिळत आहे. तज्ज्ञांच्या मते, १ कोटी घरांवर सौर पॅनेल बसवण्याचे लक्ष्य पूर्ण झाल्यास देशाला दरवर्षी लाखो टन कार्बन उत्सर्जन कमी करण्यास मदत होईल.

मोफत वीज, सरकारी अनुदान, आर्थिक बचत आणि पर्यावरण संरक्षण या चौफेर फायद्यांमुळे ‘पीएम सूर्य घर’ योजना देशातील सर्वात यशस्वी ऊर्जा योजनांपैकी एक ठरत आहे. त्यामुळे भारतातील सोलर क्रांती आता घराघरात पोहोचत असून ऊर्जा स्वावलंबनाच्या दिशेने देश वेगाने वाटचाल करत असल्याचे स्पष्ट होत आहे.

Exit mobile version