पुढेही रेपो दरात बदल होण्याची शक्यता नाही

व्याजदर ५.२५ टक्क्यांवरच कायम राहू शकतात

पुढेही रेपो दरात बदल होण्याची शक्यता नाही

घर खरेदीचे स्वप्न पाहणारे, वाहन कर्ज घेतलेले किंवा वैयक्तिक कर्जाचा हप्ता भरणारे लाखो भारतीयांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) आगामी काळात रेपो दरात कोणतीही वाढ करण्याच्या मनःस्थितीत नसल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे कर्जदारांच्या EMI वर अतिरिक्त भार पडण्याची शक्यता सध्या तरी दूर झाली असून व्याजदर स्थिर राहण्याची चिन्हे दिसत आहेत.

जून महिन्यात झालेल्या पतधोरण आढाव्यात RBI ने रेपो दर ५.२५ टक्क्यांवर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर बाजारपेठेत व्याजदर वाढीबाबत अनेक तर्क-वितर्क सुरू होते. मात्र, सध्याची आर्थिक परिस्थिती, नियंत्रणात असलेली महागाई आणि जागतिक बाजारातील अनिश्चितता लक्षात घेता केंद्रीय बँक घाईघाईने कोणताही कठोर निर्णय घेणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.
हे ही वाचा:
स्फोटक फलंदाजीचे दुसरे नाव वैभव सूर्यवंशी, ११ चेंडूंत अर्धशतक

विश्वचषक फुटबॉल इतिहासात जपानने एका सामन्यात केले सर्वाधिक गोल

युद्ध पेटलं की कोण कमावतो?

१० लाख रुपयांना बाळांची विक्री; १३ जण अटकेत

पश्चिम आशियामध्ये सुरू असलेला तणाव, कच्च्या तेलाच्या किंमतीतील चढ-उतार आणि जागतिक अर्थव्यवस्थेवरील वाढता दबाव यामुळे RBI सावध पवित्रा घेत आहे. विशेषतः इंधनाच्या किंमती वाढल्यास महागाई पुन्हा डोके वर काढू शकते. त्यामुळे आर्थिक वाढ आणि महागाई यांच्यात संतुलन राखण्याचे मोठे आव्हान केंद्रीय बँकेसमोर आहे. याच पार्श्वभूमीवर रेपो दर स्थिर ठेवून परिस्थितीचा बारकाईने आढावा घेण्याची भूमिका RBI ने स्वीकारल्याचे दिसून येत आहे.

रेपो दर स्थिर राहिल्याने गृहकर्ज, वाहनकर्ज आणि इतर कर्जांच्या EMI मध्ये तातडीने वाढ होणार नाही. गेल्या काही वर्षांत व्याजदर वाढीमुळे कर्जदारांचे मासिक बजेट विस्कळीत झाले होते. मात्र आता व्याजदरातील स्थिरता लाखो कुटुंबांना आर्थिक दिलासा देणारी ठरणार आहे. विशेषतः रेपो-लिंक्ड कर्ज असलेल्या ग्राहकांना याचा थेट फायदा मिळणार आहे.

दुसरीकडे, RBI ने महागाईचा अंदाज वाढवला असला तरी ती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता सध्या कमी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. अर्थव्यवस्थेचा विकासदरही अपेक्षेपेक्षा मजबूत राहण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे व्याजदर वाढवण्याची तातडीची गरज निर्माण झालेली नाही.

अर्थतज्ज्ञांच्या मते, जर कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये मोठी उसळी आली नाही आणि महागाई नियंत्रणात राहिली, तर यंदाच्या उर्वरित काळातही रेपो दर स्थिर राहू शकतो. त्यामुळे घर, वाहन किंवा व्यवसायासाठी कर्ज घेण्याचा विचार करणाऱ्यांसाठी हा काळ तुलनेने अनुकूल मानला जात आहे. सध्या तरी RBI च्या भूमिकेमुळे कर्जदारांना मोठा दिलासा मिळाला असून EMI वाढीची भीती दूर झाल्याचे चित्र आहे.

Exit mobile version