पश्चिम आशियातील तणावामुळे गेल्या काही आठवड्यांपासून जागतिक बाजारपेठा अस्थिर झाल्या होत्या. तेलाच्या किंमती गगनाला भिडल्या होत्या, गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण होते आणि अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांवर त्याचा दबाव वाढला होता. मात्र आता अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चेत सकारात्मक प्रगती झाल्याच्या संकेतांमुळे परिस्थिती बदलताना दिसत आहे. पश्चिम आशियात शांततेची शक्यता निर्माण होताच जागतिक बाजारांनीही सुटकेचा निःश्वास सोडला असून त्याचा सर्वात मोठा फायदा भारताला होताना दिसत आहे.
पश्चिम आशियातील तणाव कमी होण्याच्या बातमीनंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण झाली. भारत आपल्या गरजेपैकी सुमारे ८५ टक्क्यांहून अधिक कच्चे तेल आयात करतो. त्यामुळे तेलाच्या किंमतीतील प्रत्येक घसरण भारतासाठी मोठा आर्थिक दिलासा ठरते. तेल स्वस्त झाल्याने भारताचे आयात बिल कमी होण्याची शक्यता निर्माण झाली असून महागाईवरील दबावही कमी होऊ शकतो.
हे ही वाचा:
भाचीची छेड काढली म्हणून जाब विचारणाऱ्या आनंदकुमारचा नासिरने चिरला गळा
शिवसेना फक्त एकच, ती ही एकनाथ शिंदेचीच
शस्त्रसंधीनंतरही इस्रायलचे लेबनॉनवर हल्ले सुरूच; पाच जणांचा मृत्यू
नीट परीक्षेसाठी नागपूरच्या विद्यार्थ्याला २,४०० किलोमीटर दूर अबूधाबीमधील परीक्षा केंद्र
या सकारात्मक घडामोडींचा परिणाम भारतीय बॉण्ड बाजारावरही दिसून आला. १० वर्षांच्या सरकारी रोख्यांची यिल्ड तब्बल १२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर घसरली. गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात सरकारी रोख्यांकडे मोर्चा वळवल्याने बॉण्डच्या किंमती वाढल्या आणि यिल्ड कमी झाली. याचा अर्थ बाजाराला भारतीय अर्थव्यवस्थेबाबत अधिक विश्वास वाटत आहे. यिल्ड घसरल्याने सरकारच्या कर्जउभारणीचा खर्च कमी होण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, पश्चिम आशियातील तणाव कमी होण्याच्या शक्यतेमुळे भारतीय रुपयालाही बळ मिळाले आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत होत असून त्यामुळे आयात खर्च आणखी कमी होऊ शकतो. तसेच परदेशी गुंतवणूकदारांचा भारतीय बाजारावरील विश्वासही वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांत परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय सरकारी रोख्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे.
अर्थतज्ज्ञांच्या मते, पश्चिम आशियातील परिस्थिती आणखी स्थिर झाली आणि तेलाच्या किंमती नियंत्रणात राहिल्या तर त्याचा थेट फायदा भारताच्या आर्थिक वाढीला होईल. महागाई आटोक्यात राहील, व्याजदरांवरील दबाव कमी होईल आणि उद्योग-व्यवसायांसाठी अनुकूल वातावरण निर्माण होईल. याशिवाय शेअर बाजारालाही याचा सकारात्मक फायदा होण्याची शक्यता आहे.
एकूणच, पश्चिम आशियातून आलेल्या शांततेच्या संकेतांनी भारताला मोठा आर्थिक दिलासा दिला आहे. तेलाच्या किंमतीतील घसरण, मजबूत होत असलेला रुपया, वाढती परदेशी गुंतवणूक आणि घसरती बॉण्ड यिल्ड या घडामोडी भारतीय अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक मानल्या जात असून जागतिक अनिश्चिततेच्या काळात ही भारतासाठी आश्वासक बातमी ठरत आहे.







