एप्रिलपासून म्यानमारमधील सायबर फसवणूक छावणीत अडकलेल्या नाशिकमधील ३० वर्षीय तरुणाने अखेर आपल्या कुटुंबाशी संपर्क साधून तेथील भीषण परिस्थितीचा खुलासा केला आहे. त्याच्या कथनामुळे बनावट नोकरीच्या आमिषाने परदेशात नेल्यानंतर अडकलेल्या महाराष्ट्रातील किमान २५ जणांच्या हालअपेष्टांकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे. त्यामध्ये नाशिकमधील आठ जणांचाही समावेश आहे. या सर्वांना लवकरात लवकर मायदेशी परत आणण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी सरकारकडे तातडीने मदतीची मागणी केली आहे.
व्हॉट्सअप कॉलमधून सांगितली कहाणी
बँकॉकमधील कॉल सेंटरमध्ये दरमहा ७० हजार रुपयांच्या पगाराची नोकरी देण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर थायलंडला गेलेल्या या तरुणाने व्हॉट्सअप कॉलद्वारे कुटुंबीयांना सांगितले की, त्याला अज्ञात व्यक्तींनी थायलंड–म्यानमार सीमेवरील एका छावणीत नेले. त्याच्या सुटकेसाठी अपहरणकर्त्यांनी तब्बल ८ लाख रुपयांची खंडणी मागितली असल्याचेही त्याने सांगितले.
“आमच्याकडून दररोज १८ तास काम करून घेतले जाते. आम्हाला असे अन्न दिले जाते की ते उंदीर आणि झुरळेसुद्धा खाणार नाहीत,” असे त्याने कुटुंबीयांना सांगितले. त्याने पुढे सांगितले की, काम करण्यास नकार देणाऱ्यांना एका खोलीत बंद करून त्यांना विजेचे धक्के दिले जातात. छावणीत असलेल्या महिलांनाही अत्यंत क्रूर छळ सहन करावा लागत असल्याचा आरोप त्याने केला. सुरुवातीला एका महिन्याचे अत्यल्प मानधन देऊन प्रशिक्षण दिले जाते आणि त्यानंतर जबरदस्तीने सायबर फसवणुकीच्या कामात ढकलले जाते, असेही त्याने सांगितले.
हे ही वाचा:
अमेरिकेतील एका अहवालाने फिरवला सोन्याचा गेम
“ही खऱ्या बंधुत्वाची भावना”; व्हेनेझुएलाकडून भारताचे आभार
पाक कोस्ट गार्ड तळावर BLAचा आत्मघाती हल्ला; ३० जवान ठार
किशोरी पेडणेकरांच्या घुसखोरीविरोधात महापौर रितू तावडेंची तक्रार
ऑनलाइन फसवणुकीसाठी सक्ती
बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या आणि यापूर्वी मर्चंट नेव्हीमध्ये काम केलेल्या या तरुणाने २५ एप्रिल रोजी मित्राने दिलेल्या परदेशातील नोकरीच्या ऑफरवर विश्वास ठेवून घर सोडले. मात्र, बँकॉकमध्ये काम सुरू करण्याऐवजी त्याला सीमेपलीकडे म्यानमारमध्ये नेण्यात आले. महाराष्ट्रातील आणखी एका कुटुंबानेही आपल्या मुलाबद्दल गंभीर चिंता व्यक्त करत सरकारला केवळ त्यालाच नव्हे, तर अशा छावण्यांमध्ये अडकलेल्या सर्व भारतीयांची सुटका करण्याचे आवाहन केले आहे.
भाजपचे नगरसेवक प्रशांत दिवे यांनी सांगितले की, त्यांनी आपल्या प्रभागातील तीन तरुणांसह काही पीडितांशी संवाद साधला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, छावण्यांमध्ये अडकलेल्या लोकांना बनावट फेसबुक खाती तयार करण्यास, ऑनलाइन मैत्री करण्यास आणि लोकांना क्रिप्टोकरन्सी गुंतवणुकीच्या नावाखाली फसवण्यास भाग पाडले जाते. एका खोलीत सुमारे २० जणांना ठेवले जाते आणि ठरवून दिलेले लक्ष्य पूर्ण न करणाऱ्यांना मारहाण केली जाते.
या तरुणांनी सांगितले की, महाराष्ट्रातील नाशिक, बीड आणि धाराशिव येथील रहिवाशांसह सुमारे २५ जण या छावण्यांमध्ये अडकले आहेत. त्यांच्या अंदाजानुसार, अशाच प्रकारच्या सायबर फसवणूक केंद्रांमध्ये ४०० हून अधिक भारतीय सध्या अडकलेले असू शकतात.
सरकारकडून मदतीचे प्रयत्न
स्थानिक भाजप नगरसेवकांच्या मदतीने पीडितांच्या कुटुंबीयांनी महाराष्ट्राचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली आहे. महाजन यांनी या प्रकरणाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली असून, पीडितांच्या सुरक्षित सुटकेसाठी प्रयत्न सुरू असल्याचे कुटुंबीयांना आश्वासन दिले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, महाजन यांनी काही अडकलेल्या तरुणांशीही दूरध्वनीवर संवाद साधून सरकार त्यांच्या सुरक्षित परतीसाठी प्रयत्नशील असल्याचा विश्वास दिला.
बनावट नोकऱ्यांचे आमिष, सायबर गुन्ह्यांत ढकलण्याचा वाढता प्रकार
गेल्या काही महिन्यांत म्यानमार, कंबोडिया, लाओस आणि शेजारील देशांमध्ये कार्यरत गुन्हेगारी टोळ्यांनी आयटी, डेटा एंट्री, डिजिटल मार्केटिंग आणि ग्राहक सेवा अशा क्षेत्रांतील बनावट नोकरीच्या जाहिरातींद्वारे अनेक भारतीय तरुणांना जाळ्यात ओढले आहे. संबंधित देशांत पोहोचल्यानंतर त्यांचे पासपोर्ट जप्त केले जातात आणि त्यांना ऑनलाइन गुंतवणूक तसेच क्रिप्टोकरन्सी फसवणूक करण्यास भाग पाडले जाते.
यापूर्वी याच वर्षी आंध्र प्रदेशातील १२० हून अधिक नागरिकांची म्यानमारमधील अशाच छावण्यांतून सुटका करण्यात आली होती. तसेच गेल्या वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांत आणखी ७९ भारतीयांना सुरक्षितपणे मायदेशी परत आणण्यात आले होते.
