दक्षिण मुंबईतील एका ज्वेलर्सच्या हत्येचा आणि खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा कट मुंबई गुन्हे शाखेने उधळून लावत एका पोलीस खबऱ्यासह दोन जणांना अटक केली आहे.
या कटात सहभागी असलेल्या एका हिंदी दैनिकाच्या संपादकासह चार जणांविरुद्ध लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष ९ च्या पथकाने बेकायदेशीर शस्त्र प्रकरणात संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आलेल्या निरंजन गुप्ता या पोलीस खबऱ्याच्या चौकशीत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
हे ही वाचा:
भाजप संघटन पर्वचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी म्हणून रवींद्र चव्हाणांची नियुक्ती!
‘मंदिर तेथे सामूहिक आरती’ला सोलापुरातून प्रारंभ!
अभिनेत्री उर्मिला कोठारेंच्या कारने दोघांना उडवले, एकाचा मृत्यू
गुन्हे शाखेने या पोलीस खबऱ्याकडे कसून चौकशी केली असता त्याने पोलिसांना दिलेल्या माहिती दक्षिण मुंबईतील ज्वेलर्सला बेकायदेशीर शस्त्र प्रकरणात अडकविण्यासाठी त्याच्या एका कर्मचाऱ्याच्या मदतीने त्याच्या कार्यालयात देशी बनावटीचे पिस्तुल आणि ९ काडतुसे ठेवली आहे.
गुन्हे शाखेने गुप्ता ने दिलेली माहिती खरी आहे का याची खात्री करण्यासाठी ज्वेलर्सच्या कार्यालयाची झडती घेतली असता पोलिसांना एक पिस्तुल आणि ९ काडतुसे मिळून आली. या कटात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.
या दोघांकडे पोलिसांनी कसून चौकशी केली असता आणखी एक धक्कादायक माहिती पोलिसांनी केलेल्या चौकशीत समोर आली. दक्षिण मुंबईतील ज्वेलर्स मालकाच्या एका जागेचा वाद सुरू आहे. ज्वेलर्स मालकाला ती जागा विकसीत करायची होती, मात्र त्या ठिकाणी भाडेतत्वावर राहणारा एक इसम ही जागा सोडण्यास तयार नव्हता.
या जागेच्या वादात दक्षिण मुंबईतील एका वृत्तपत्राच्या संपादकाने उडी घेतली. नोव्हेंबर महिन्यात ज्वेलर्सचा अपघात घडवून त्याला मारण्याचा कट रचण्यात आला. नोव्हेंबरमध्ये अपघात देखील घडवून आणला होता. परंतु सुदैवाने ज्वेलर्स मालक या अपघातातुन बचावले. या आपघाताची नोंद लो. टी. मार्ग पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.
ही योजना असफल झाल्यानंतर भाडेकरू, संपादक यांनी ज्वेलर्सला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा कट रचला. त्या साठी त्यांनी ज्वेलर्सच्या लेखापाल याला देखील हाताशी घेतले.
त्यानंतर निरंजन गुप्ता या पोलीस खबऱ्याला या कटात सामील करून घेतले, पिस्तुल आणण्यासाठी आणि त्याची खबर पोलिसांना देण्यासाठी त्याला अडीच लाख रुपये देण्यात आले होते, या योजनेनुसार पिस्तुल आणि काडतुसे बिहार येथून आणून लेखपालच्या मदतीने ते ज्वेलर्सच्या कार्यालयात ठेवण्यात देखील आले होते.
खबरी पोलिसांना खबर देऊन आपले काम देखील फत्ते केले होते. मात्र पोलिसांना यामध्ये संशय आला आणि खबऱ्याची उलट तपासणीमध्ये हा कट समोर आला. गुन्हे शाखेने उघडकीस आणलेल्या या कटाप्रकरणी लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात वृत्तपत्राच्या संपादकासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
.







