गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान भाविकांच्या गर्दीचा फायदा घेत मोबाईल फोन आणि सोनसाखळी चोरणाऱ्या १५ जणांच्या टोळीला काळाचौकी पोलिसांनी अटक केली आहे. ही टोळी गुजरातमधील मेहसाणा गावातील असून, मुंबईत विशेषतः गणेशोत्सवाच्या काळात चोरी करण्यासाठी दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या टोळीकडून दोन सोनसाखळ्या आणि सहा मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. लालबाग परिसरात विसर्जनावेळी मोबाईल आणि सोनसाखळी चोरीच्या शेकडो तक्रारी नोंद झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी कसून तपास सुरू केला होता.
हे ही वाचा :
भारत टिकटॉकवरील बंदी उठवणार का?, मंत्री वैष्णव म्हणाले…
नेपाळमधील निदर्शनांनंतर सीमेवर अलर्ट!
इस्रायली संरक्षण धोरण तज्ज्ञ म्हणतात ‘ही’ गोष्ट मोदींकडून शिकण्यासारखी
हल्ल्याला इस्रायल देणार प्रत्युत्तर
काळाचौकी पोलिसांच्या पथकाने विसर्जनाच्या दिवशी टोळीवर बारीक लक्ष ठेवून कारवाई केली आणि १५ सराईत चोरांना गजाआड केले. ही टोळी देशभरातील गर्दीच्या ठिकाणी सक्रिय असल्याचे उघड झाले आहे. उत्सवावेळी चोरी करून लगेच माल शहराबाहेर पाठवण्याची जबाबदारी टोळीप्रमुखांकडे असते. यासाठी ते महिलांचा आणि अल्पवयीन मुलांचा वापर करतात, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. सध्या पोलिसांकडून अटक केलेल्या टोळीच्या चौकशीसह जप्त केलेल्या मोबाईल फोन आणि सोनसाखळ्यांचा शोध सुरू आहे.







