पश्चिम बंगाल पोलिसांना मोठे यश मिळाले असून, गेल्या तीन दिवसांपासून फरार असलेल्या तृणमूल काँग्रेस (टीएमसी) नेते जहांगीर खान याची पत्नी रेजिना बीबी हिला अटक करण्यात आली आहे. फाल्टा पोलीस ठाण्यावर हल्ला करण्याच्या कटातील प्रमुख सूत्रधार असल्याचा आरोप तिच्यावर आहे. यापूर्वीच पोलिसांनी जहांगीर खान याला अटक केली होती. आता रेजिना बीबी यांच्या अटकेनंतर तिच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३, शस्त्रास्त्र कायदा १९५९ आणि स्फोटक पदार्थ कायदा १८८४ अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना दक्षिण २४ परगणा जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
राज्य पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्य पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (सीएपीएफ) संयुक्त कारवाईत भारत-नेपाळ सीमेजवळील एका ठिकाणाहून रेजिना बीबी हिला अटक करण्यात आली. जहांगीर खान याला पोलीस कोठडीतून सोडवून नेण्याच्या उद्देशाने टीएमसी कार्यकर्त्यांनी फाल्टा पोलीस ठाण्यावर केलेल्या हल्ल्याच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली. रेजिना बीबी हिच्या अटकेनंतर या प्रकरणात अटक झालेल्यांची संख्या २६ वर पोहोचली आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, फाल्टा पोलीस ठाण्यावर हल्ला करण्याची योजना सोमवारी एका गुप्त ठिकाणी झालेल्या बैठकीत आखण्यात आली होती. ही बैठक रेजिना बीबी हिने बोलावली होती, असा आरोप पोलिसांनी केला आहे. जिल्हा पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, बैठकीत कार्यकर्त्यांना फाल्टा पोलीस ठाण्यापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावरील ठरावीक ठिकाणी जमा होण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानंतर अचानक आणि संघटित पद्धतीने पोलीस ठाण्यावर धाड टाकून जहांगीर खान याची सुटका करण्याची योजना आखण्यात आली होती.
हे ही वाचा:
FATFच्या उपाध्यक्षपदी आयएएस अधिकारी विवेक अग्रवाल यांची निवड
नीट परीक्षेसाठी नागपूरच्या विद्यार्थ्याला २,४०० किलोमीटर दूर अबूधाबीमधील परीक्षा केंद्र
नशेत धिंगाणा घालणाऱ्या तरुणीचा पोलिसांवर हल्ला; केस ओढत, नखांनी ओरबाडले
कांदिवलीत बँकेत चोरीचा प्रयत्न, सराईत गुन्हेगार जेरबंद
अधिकारी यांनी सांगितले की, फाल्टा पोलीस ठाण्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत विविध गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये राष्ट्रविरोधी कारवायांशी संबंधित तरतुदींचाही समावेश आहे. “हल्लेखोरांना कठोर शिक्षा मिळेल याची खात्री करण्याबरोबरच, त्यांच्या मालमत्ता जप्त करून सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीची भरपाईही वसूल केली जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.







