गोरेगाव येथील खंडणीच्या गुन्हयात माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग, रियाज भाटी आणि विनय सिंह उर्फ बबलू यांना फरार घोषित करण्यात यावे व त्यांची संपत्ती ताब्यात घेण्यात यावी असा अर्ज मुंबई गुन्हे शाखेने न्यायालयात सादर केला आहे. या अर्जावर सोमवारी सुमावणी होणार असल्याचे समजते.
गोरेगाव येथील हॉटेल बोहो अँड रेस्टॉरंट हे बिनदिक्कत सुरू ठेवून पोलिसांच्या कारवाई पासून वाचवण्यासाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस अधिकारी सचिन वाझे याने तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या सांगण्यावरून लाखो रुपयांची खंडणी उकल्याची तक्रार हॉटेल मालक बिमल अग्रवाल याने गोरेगाव पोलीस ठाण्याचे केली होती. याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग, सचिन वाझे, खाजगी इसम अल्पेश पटेल, रियाज भाटी, विनय सिंह उर्फ बबलू, सुमित सिंह उर्फ चिंटू यांच्याविरुद्ध खंडणी, धमकी देणे, कट रचणे ,पुरावे नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास मुंबई गुन्हे शाखा कक्ष ११ कडे सोपवण्यात आला असून या प्रकरणी गुन्हे शाखेने अल्पेश पटेल आणि सुमित सिंह या दोघांना अटक करण्यात आली होती. दरम्यान गुन्हे शाखेने परमबीर सिंग, रियाज भाटी, विनय सिंह उर्फ बबलू यांना नोटीस पाठवण्यात आले असून गेल्या आठवड्यात सचिन वाझे याला या प्रकरणात तळोजा तुरुंगातून ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली आहे. परमबीर सिंग आणि इतर दोघे गुन्हे शाखेला मिळून येत नसून गुन्हे शाखेने या तिघांना नोटीस पाठवल्यानंतर रियाज भाटी आणि विनय सिंह यांच्या पत्नीचे जबाब नोंदवण्यात आले असून परमबीर सिंग यांच्या घराजवळ सुरक्षेसाठी असणाऱ्या पोलीस कर्मचारी आणि स्वयंपाकी यांचे जबाब नोंदवण्यात आलेले आहे.
हे ही वाचा:
लसीकरण मोहिमेत मुंबईला ‘१०० टक्के’ गुण!
चार राज्यांचा विधानसभा सर्वे काय सांगतो?
अल्पवयीन मुलीवर ४०० जणांनी केला बलात्कार
परमबीर सिंग रियाज भाटी आणि विनय सिंह हे मिळून येत नसल्यामुळे या तिघांना न्यायालयाने फरार घोषित करावे यासाठी गुन्हे शाखेने किल्ला न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर सोमवारी किल्ला न्यायालयात सुनावणी होणार आहे. या तिघांना फरार घोषित केल्यानंतर त्यांच्या संपत्तीवर देखील टाच येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
रियाज भाटी हा या प्रकरणानंतर गायब झाल्यानंतर रियाज भाटी याचा शोध घेण्यात येत होता, मात्र त्याचा काही थांगपत्ता लागत नसल्यामुळे रियाज भाटीचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखने कंबर कसली असून मुंबई गुन्हे शाखेच्या इतर कक्ष आणि खंडणी विरोधी पथकांना भाटीचा शोध घेऊन त्याला अटक करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून देण्यात आले आहेत.