कलिंगड खाऊन एकाच कुटुंबातील 4 जणांच्या मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट

पोलीस तपासात धक्कादायक बाब समोर

कलिंगड खाऊन एकाच कुटुंबातील 4 जणांच्या मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट

मुंबईतील पायधुनी परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण शहर हादरून गेले आहे. कलिंगड खाल्ल्यानंतर एका कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याने सुरुवातीला अन्नातून विषबाधा झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र आता तपास पुढे सरकत असताना या प्रकरणाने अधिक गंभीर वळण घेतले असून, कलिंगडावर झिंक फॉस्फाइड मिसळलेले मीठ लावण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पायधुनीतील डोकाडिया कुटुंबाने २६ एप्रिलच्या रात्री जेवणानंतर कलिंगड खाल्ले होते. त्यानंतर काही वेळातच कुटुंबातील अब्दुल्ला डोकाडिया, त्यांची पत्नी नसरीन आणि दोन मुली आयेशा व झैनब यांची प्रकृती अचानक बिघडू लागली. चौघांनाही तीव्र उलट्या, जुलाब, पोटदुखी आणि चक्कर येण्याचा त्रास सुरू झाला. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने जेजे रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतरही चौघांचाही मृत्यू झाला. एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हे ही वाचा:
जम्मू-कटरा, हावडा-दिल्ली कॉरिडॉरसाठी १,२०० कोटींच्या रेल्वे पायाभूत प्रकल्पांना मंजुरी

मोदींवरच्या ट्विटनतर हेले लिंगचे फॉलोअर्स वाढले

‘योग अपनवा, निरोगी राहा’ ; मेरी कोम दररोज योग करून स्वतःला ठेवतात फिट

यशासाठी त्याग आवश्यक, शॉर्टकट घेतला तर पोल उघडेल

या प्रकरणाचा तपास सुरू झाल्यानंतर पोलिसांनी घरातील अन्नपदार्थ, मिठाचे नमुने आणि कलिंगडाचे अवशेष तपासणीसाठी पाठवले. फॉरेन्सिक अहवालात मृतांच्या शरीरात झिंक फॉस्फाइड हे विषारी रसायन आढळून आले. विशेष म्हणजे मृतांच्या यकृत आणि मूत्रपिंडांमध्ये हिरवट बदल दिसून आल्याने विषबाधेचा संशय अधिक बळावला आहे. झिंक फॉस्फाइड हे सामान्यतः उंदीर मारण्यासाठी वापरले जाणारे अत्यंत घातक रसायन मानले जाते. हे शरीरात गेल्यानंतर काही तासांतच अंतर्गत अवयव निकामी होऊ शकतात.

तपास अधिकाऱ्यांच्या मते, कलिंगड खाताना त्यावर मीठ लावले गेले होते आणि त्या मिठामध्ये झिंक फॉस्फाइड मिसळले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र हे विष नेमके कुणी आणि कशासाठी मिसळले, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. घरातून कोणतेही विषारी पदार्थ जप्त झालेले नसल्याने पोलिसांसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ही घटना अपघाती आहे, आत्महत्येचा प्रकार आहे की नियोजित कट, याचा तपास सध्या सुरू आहे.

या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. अनेकांनी फळ खरेदी करताना अधिक सतर्कता बाळगण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, पोलिसांनी नातेवाईक, शेजारी तसेच संबंधित विक्रेत्यांची चौकशी सुरू ठेवली असून, या प्रकरणामागील सत्य शोधण्यासाठी विविध अंगांनी तपास केला जात आहे.

Exit mobile version