सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प (STP) साफसफाईच्या कामादरम्यान विषारी गॅसमुळे जीव गुदमरून दोन कामगार बेशुद्ध झाले, त्यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले असता डॉक्टरांनी एकाला मृत घोषित केले असून दुसऱ्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.ही घटना बुधवारी सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या पवई हिरानंदानी येथे घडली. या प्रकरणी पवई पोलिसांनी प्राथमिक तपसावरून अपमृत्युची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे. मृत कामगाराची ओळख पटविण्यात येत आहे.
मुंबई अग्निशमन दलाकडून (MFB) मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवारी सकाळी सुमारे १०.४२ वाजता घडली. अल्ट्राटेक प्रा. लि. या कंपनीचे दोन कामगार सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प (STP) प्रकल्पाच्या टाकीत साफसफाईचे काम करत असताना दोघे विषारी वायूच्या संपर्कात आल्याने त्यांना श्वास घेणे अवघड झाले आणि ते आत अडकले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पवई पोलीस, रुग्णवाहिका आणि पालिकेचे वॉर्ड कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
हे ही वाचा:
अमरावतीत नवरदेवावर हल्ला करून पळणाऱ्याचा ड्रोनने केला पाठलाग
लोढा ग्रुपचे माजी संचालक राजेंद्र लोढा यांच्या १४ ठिकाणांवर ईडीचे छापे
दहशतवादाविरुद्ध भारताचा ठाम निर्धार
भारतात भूतानकडून वीज निर्यातीचा मार्ग मोकळा!
तात्काळ दोन्ही कामगारांना बाहेर काढून हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी फुलचंद कुमार (२८ ) यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. तर दुसऱ्याची ओळख पटलेली नसून त्याला रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पवई पोलिसांनी प्राथमिक माहिती वरून अपमृत्यूची नोंद केली आहे.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, पोलीस आणि पालिका अधिकाऱ्यांनी या दुर्घटनेचा तपास सुरू केला आहे.







