पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला असून पाकिस्तानच्या कुरापती सुरूचं असल्याचे समोर आले आहे. सीमारेषेवर गेले पाच दिवस सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. अशातच आता पाकिस्तानने भारतावर सायबर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानी हॅकर्सनी भारतीय लष्कराचं संकेतस्थळ हॅक करण्याचा प्रयत्न केला.
पाकिस्तानने भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न केला असून माहितीनुसार पाकिस्तानने मागच्या दोन दिवसांत दोन वेळा भारतीय लष्कराच्या वेबसाईटवर सायबर हल्ला करून वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताच्या तज्ज्ञांनी हे हल्ले हाणून पाडले आहेत. दुसरीकडे भारताने काही पाकिस्तानी युट्युब चॅनेल्सवर बंदी घातल्यानंतर पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा एम. आसिफ यांच्या एक्स अकाऊंटला ब्लॉक केलं आहे. जम्मू काश्मीरबाबत चुकीची माहिती आणि खोट्या बातम्या पसरवल्याने तसेच भारतामध्ये दहशतवादाला प्रोत्साहन दिल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
पाकिस्तानच्या या प्रयत्नांना भारताच्या स्तरित सायबर सुरक्षा आर्किटेक्चरने शोधून काढून त्यांचे मूळ पाकिस्तानमध्ये असल्याचे स्पष्ट केले. आर्मी पब्लिक स्कूल (एपीएस) श्रीनगर आणि एपीएस रानीखेत या दोन्ही वेबसाइट्स, आर्मी वेल्फेअर हाऊसिंग ऑर्गनायझेशन (एडब्ल्यूएचओ), इंडिया एन एअर फोर्स प्लेसमेंट ऑर्गनायझेशन पोर्टल यांना लक्ष्य करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, हे प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत.
हे ही वाचा..
कौशल्य विकासासाठी भारताचा हे नवे नियोजन
पहलगाम हत्याकांडाचा सूत्रधार हाशिम मुसाला पाकिस्तानचे कमांडो प्रशिक्षण
मुख्यमंत्री योगी यांचा का झाला संताप ?
दरम्यान, भारतीय लष्कराने २८ एप्रिल – २९ एप्रिलच्या रात्री कुपवाडा आणि बारामुल्ला जिल्ह्यांसमोरील भागात तसेच जम्मू आणि काश्मीरमधील अखनूर सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर (एलओसी) पाकिस्तानी लष्कराच्या छोट्या शस्त्रांच्या गोळीबाराला प्रभावीपणे प्रत्युत्तर दिले. गेल्या पाच दिवसांपासून पाकिस्तानकडून सातत्याने सीमावर्ती भागात शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात असून भारतीय लष्कराकडून याला चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.