मालाड येथील चिंचोली बंदर परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या किरकोळ वादातून पाच जणांनी मिळून एका तरुणाचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना गुरुकृपा बार अँड रेस्टॉरंटसमोर पहाटेच्या सुमारास घडली. मृत तरुणाचे नाव कल्पेश भानुशाली असे असून, तो स्थानिक रहिवासी होता.

भानुशाली हा बार मालकाचा मित्र होता आणि त्याचा गणपती मूर्ती बनवण्याचा कारखाना होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्पेश भानुशाली हा संजय मकवाना व हॉटेल मालकाच्या भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याचं मकवानाशी वाद झाले. संतापलेल्या मकवानाने आपल्या चार साथीदारांना बोलावून घेतलं आणि सर्वांनी मिळून कल्पेशवर तुफान हल्ला केला. धारदार शस्त्रांसह बिअरच्या बाटल्या फोडून डोक्यावर वार केल्याने कल्पेश गंभीर जखमी झाला.
हे ही वाचा:
मुंबईत बॉम्बची धमकी, पोलिस अलर्ट
अमेरिकेतील तरुण नेते कर्क यांच्या हत्येनंतर क्रिकेटपटू डुप्लेसिसची टीका
स्थानिक नागरिकांनी त्याला तातडीने रुग्णालयात हलवलं; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण पसरलं आहे. मृतकाचा भाऊ परेश भानुशाली यांनी आरोप केला की, “गुरुकृपा बार इतक्या उशिरापर्यंत सुरू नसता, तर माझ्या भावाचा जीव वाचला असता. फक्त जेवणावरून झालेल्या वादामुळे संजय मकवाना व त्याच्या साथीदारांनी माझ्या भावाची हत्या केली.”
या प्रकरणी मालाड पोलिसांनी संजय मकवाना याला अटक केली असून इतर चार आरोपी फरार आहेत. परिमंडळ ११ चे पोलिस उपायुक्त संदीप जाधव यांनी सांगितले की, “मध्यरात्री दीड वाजता झालेल्या भांडणानंतर पाच जणांनी मिळून कल्पेश भानुशालीची हत्या केली. एका आरोपीला अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.” पुढील तपास मालाड पोलिस करत आहेत.







