गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!
माघ महिन्यातील शुक्ल चतुर्थीला साजरी होणारी माघी गणेश जयंती ही भगवान श्री गणेशांच्या जन्मदिनाची पवित्र तिथी मानली जाते. शास्त्रांनुसार याच दिवशी गणपतींचा जन्म झाला, अशी मान्यता आहे. महाराष्ट्रात विशेषतः पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर आदी भागांत माघी गणेश जयंती मोठ्या श्रद्धेने साजरी केली जाते. पहाटेपासूनच मंदिरांमध्ये भक्तांची गर्दी दिसून येते. अनेक ठिकाणी अभिषेक, आरती, भजन-कीर्तन, प्रवचनांचे आयोजन केले जाते.
माघी गणेश जयंतीच्या दिवशी भक्त उपवास करतात. गणेश पूजन, दुर्वा अर्पण, मोदक व नैवेद्य, आरती व मंत्रजप या माध्यमातून भक्त गणरायाची कृपा मिळावी, विघ्ने दूर व्हावीत आणि सुख- समृद्धी लाभावी अशी प्रार्थना करतात. माघी गणेश जयंतीला २१ मोदकांचा नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा आहे. मोदक हे गणपतींचे आवडते खाद्य मानले जाते. घराघरांत गूळ-नारळ, उकडीचे मोदक खास बनवले जातात. या दिवशी महिलांकडून विशेष व्रत केले जाते. कुटुंबातील सुख-शांती, आरोग्य आणि मुलांच्या यशासाठी गणरायाकडे साकडे घातले जाते. अनेक ठिकाणी महिलांचे सामूहिक भजन-कीर्तनही आयोजित केले जाते.
माघी गणेश जयंतीनिमित्त मंदिर परिसर, रस्ते आणि घरांमध्ये भक्तीमय वातावरण निर्माण होते. “गणपती बाप्पा मोरया”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून जातो. माघी गणेश जयंती हा केवळ सण नसून श्रद्धा, संयम आणि भक्तीचा उत्सव आहे. या दिवशी गणरायाची मनोभावे पूजा केल्यास जीवनातील अडचणी दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते, असा भक्तांचा विश्वास आहे.







