मीरा रोड येथील पूनम क्लस्टर सोसायटीमध्ये ईद-उल-अजहा (बकरीद) निमित्त होणाऱ्या कुर्बानीसाठी मुस्लिम कुटुंबांनी २५ ते ५० बकऱ्या आणल्यानंतर सांप्रदायिक तणाव वाढला. यामुळे स्थानिक हिंदू रहिवासी आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून तीव्र विरोध करण्यात आला. याला वराह पूजनाने उत्तर देण्याचा प्रयत्न झाल्याने पोलिसांना त्यात हस्तक्षेप करावा लागला.
बोकडांसाठी सोसायटीच्या परिसरात तात्पुरती शेड उभारण्यात आली होती. पण त्याला रहिवाशांनी तीव्र विरोध केला. स्वच्छतेच्या समस्या आणि निवासी सोसायट्यांमध्ये कत्तलीवर असलेल्या नागरी नियमांच्या उल्लंघनाच्या तक्रारीनंतर मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी हा प्रयत्न हाणून पाडला आणि शेड हटवली. पण काही कुटुंबांनी कथितरित्या रातोरात ती शेड पुन्हा उभारली, ज्यामुळे सोमवारी रात्री (२५ मे) उशिरा झटापट झाली. या घटनेत किमान तीन जण जखमी झाले, ज्यामध्ये एका हिंदू युवकावर ब्लेडने हल्लाही झाला.
विश्व हिंदू परिषद)ल आणि बजरंग दल कार्यकर्त्यांनी मंगळवारी आंदोलनात सहभाग घेत सोसायटीच्या गेटबाहेर हनुमान चालीसाचे पठण केले. त्यांनी परिसरात एका डुकराच्या पिलाला आणण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला त्याला “वराह पूजा”साठी आणल्याचा दावा करण्यात आला, त्यानंतर त्याला प्रतीकात्मक प्रतिआंदोलन असे म्हटले गेले. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून डुकराला हटवले आणि बकऱ्यांना मान्यताप्राप्त ठिकाणी हलवले. परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
विहिपचे समन्वयक हर्ष सिंग यांनी आरोप केला की, झटापटीदरम्यान त्यांच्यावर चाकूने हल्ला झाला आणि त्यांच्या हाताला दुखापत झाली. त्यांनी काशीमीरा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करून भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०७ अंतर्गत खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवण्याची मागणी केली. विहिपचे जिल्हा सचिव नागनाथ कांबळे हे देखील जखमी झाल्याचे सांगितले जात आहे.
हे ही वाचा:
राजौरीत दहशतवाद्यांविरोधात मोठी मोहीम
भारताच्या सुखोई विमानांना अत्याधुनिक संरक्षण कवच
सिद्धरामय्या गुरुवारी देणार राजीनामा; शिवकुमार यांचा मार्ग मोकळा
केरळचे मुख्यमंत्री सतीशन यांची पंतप्रधान मोदींशी भेट
भाजप आमदार संजय उपाध्याय (बोरीवली) यांनी आंदोलनाचे समर्थन करत म्हटले की, जर अल्पसंख्याक संविधानाऐवजी शरीयतचे पालन करत असतील, “तर आम्ही बकऱ्यांना डुकरांनी उत्तर देऊ.” त्यांनी बोरीवलीतील समर हाईट्स सोसायटीत झालेल्या अशाच तणावाचाही उल्लेख केला.
पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या अनेक व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल केले असून परिस्थिती तणावपूर्ण असली तरी नियंत्रणात असल्याचे सांगितले जात आहे.
