केरळचे नवे मुख्यमंत्री व्ही. डी. सतीशन यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीमध्ये भेट घेत राज्य आणि केंद्र सरकारमधील समन्वय अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतरची ही त्यांची पहिली अधिकृत दिल्ली भेट ठरली. या भेटीदरम्यान सतीशन यांनी पंतप्रधान मोदी यांना केरळच्या पारंपरिक कथकली नर्तकाची सुंदर लाकडी मूर्ती भेट म्हणून दिली. केरळच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक मानली जाणारी ही भेट सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
दहा वर्षांनंतर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट अर्थात यूडीएफने केरळमध्ये पुन्हा सत्ता मिळवली आहे. १८ मे रोजी तिरुवनंतपुरम येथे पार पडलेल्या भव्य शपथविधी सोहळ्यात व्ही. डी. सतीशन यांनी केरळच्या १३व्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी त्यांना आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. या शपथविधीनंतर राज्याच्या राजकारणात नव्या पर्वाची सुरुवात झाल्याचे मानले जात आहे.
हे ही वाचा:
चीनमधील एआय अभियंते देशाबाहेर जाऊ शकणार नाहीत
शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स ४७९ अंकांनी कोसळला
मिरारोडमध्ये कुर्बानीसाठी इमारतीतच बकऱ्यांसाठी शेड, लोकांचा तीव्र विरोध
‘डॉन ३’च्या वादानंतर रणवीर सिंग विरोधात असहकार आदेश; काय आहे प्रकरण?
नव्या मंत्रिमंडळात एकूण २० मंत्र्यांचा समावेश करण्यात आला असून त्यापैकी तब्बल १४ मंत्री प्रथमच मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. दोन महिला मंत्र्यांनाही संधी देण्यात आली असून अनुसूचित जाती समाजातील दोन प्रतिनिधींनाही मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. काँग्रेसकडे ११ मंत्रीपदे असून इंडियन युनियन मुस्लिम लीगला पाच महत्त्वाची खाती देण्यात आली आहेत. इतर मित्रपक्षांनाही सरकारमध्ये प्रतिनिधित्व मिळाले आहे.
२०२६ च्या केरळ विधानसभा निवडणुकीत यूडीएफने जोरदार मुसंडी मारत १४० पैकी १०२ जागांवर विजय मिळवला. डाव्या आघाडीला केवळ ३५ जागांवर समाधान मानावे लागले, तर भारतीय जनता पक्षाला तीन जागा मिळाल्या. या निकालामुळे केरळच्या राजकारणात मोठा बदल झाल्याचे मानले जात आहे.
मुख्यमंत्री व्ही. डी. सतीशन यांनी वित्त, कायदा, बंदरे, विमानतळ, रेल्वे, मेट्रो रेल्वे आणि प्रदूषण नियंत्रण यांसारखी महत्त्वाची खाती स्वतःकडे ठेवली आहेत. पायाभूत सुविधा विकास, रोजगारनिर्मिती, गुंतवणूक वाढ आणि कल्याणकारी योजनांना गती देणे हे नव्या सरकारचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे दिल्लीतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतची ही बैठक केरळसाठी आर्थिक मदत, विकास प्रकल्प आणि केंद्राच्या सहकार्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.







