आपले तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जी काही काडी लावली त्याची आग इतक्या लवकर भडकेल असे कोणालाही वाटले नव्हते. भारतीय जनमानस आत्मनिर्भर या विषयासाठी किती आग्रही आहे, त्याची इलक म्हणजे श्रीधर वेम्बू यांच्या कंपनीची निर्मिती असलेले अराट्टई हे एप तीन दिवसांत शंभर पटीने वाढलेले आहे. हे एप व्हॉट्सएपचा भारतीय पर्याय आहे. २०२१ पासून हे एप बाजारात आहे. त्याबाबत फारशी चर्चाही नव्हती. हे एप आता झपाट्याने डाऊनलोड केले जाते आहे. ही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टगेगिरीमुळे भारताच्या उद्योग जगताने आता आपले क्षमता पणाला लावलेली दिसते.
एव्हरी एक्शन हॅज इक्वल एण्ड अपोझिट रिएक्शन हा आईनस्टाईनचा सिद्धांत आहे. राजकारणातही तो लागू होतो. भारताला चेपण्यासाठी ट्रम्प यांनी सुरू केलेले टेरीफ वॉर एच१बी व्हीसावर लाख डॉलरची फी आकारण्यापर्यंत पोहोचले आहे. कुठे तरी उत्तर देणे गरजेचे होते. सचिन तेंडूलकर टीकाकारांना जसे बॅटने उत्तर द्यायचा तसे हे उत्तर अपेक्षित होते. हे उत्तर दिले आपले केंद्रीय तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांनी घोषणा केली की मायक्रोसॉफ्ट ऐवजी ते त्यांच्या मंत्रालयात झोहोचा पर्याय स्वीकारतायत. ही घोषणा अनेक अर्थांने क्रांतिकारी होती. आपण एका नव्या प्रकारच्या वसाहतवादाचे गुलाम झालेलो आहोत. आपण सॉफ्वेअर वापरले तर ते मायक्रोसॉफ्टचे असते, सर्च इंजिन गुगलचे, चॅटींग एप व्हाट्सएप, सोशल मीडिया मेटा किंवा एक्स. या सगळ्या कंपन्या अमेरिकी आहेत. या कंपन्या ज्या देशात जातात तिथे अमेरिकी अर्थकारणासोबत त्यांचे राजकारण सुद्धा शिरकाव करते. या सगळ्या जंजाळाच्या आडून अमेरिकेची गुलामगिरी तुमच्या गळ्यात मारली जाते. तुमचा डेटा अमेरिकी कंपन्यांच्या हाती लागतो. तुमच्या देशातील एखाद्या आंदोलनाच्या ठिणगीला वणवा बनवण्याची क्षमता या कंपन्यांमध्ये आहे. ती त्यांनी जगातील अनेक देशात सिद्ध केलेली आहे. नेपाळ हे त्याचे ताजे उदाहरण आहे. पाकिस्तानमध्येही हे सुरू आहे.
हे असे चक्रव्यूह आहे, ज्यात सगळा देश अडकलेला आहे. हे चक्रव्यूह भेदल्याशिवाय तुमचे सार्वभौमत्व सुरक्षित नाही. भारताने हे ओळखले होते. परंतु नाईलाज को क्या इलाज या तत्वावर आपण दिवस ढकलत होतो. देशाचे पंतप्रधान जाहीरपणे सांगत होते. आपण चिप पासून शिपपर्यंत सगळ्या गोष्टी भारता निर्माण केल्या पाहीजेत. तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर होऊ शकतो. भारताचा स्वत:चा सोशल मीडिया हवा असे पंतप्रधान स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात म्हणाले होते. ते प्रत्यक्षात आणण्याची सुरूवात केली अश्विनी वैष्णव यांनी. कौन कहता है आसमा मे सुराग नही होता, एक पत्थर तो उछालो यारो… असा एक शेर आहे. आकाशाच्या दिशेने तो दगड भिरकावण्याचे काम वैष्णव यांनी केले.
त्यांनी त्यांच्या कार्यालयात झोहोसाठी दारे खुली केली. श्रीधर वेम्बू या भारतीय उद्योजकाची ही कंपनी. १९९६ पासून ही कंपनी भारतात कार्यरत आहे. कंपनीचे आधीचे नाव एडवेंट नेट असे होते. सॉफ्टवेअर एज ए सर्व्हीस या क्षेत्रात झोहोने झपाट्याने विस्तार केला. कंपनीचे बाजार मूल्य २०२४ मध्ये एक लाख तीन हजार ७६० कोटी रुपये आहे. जगातील ८० देशांमध्ये झोहोची कॉर्पोरटे कार्यालये आहेत. जगभरात १८ डेटा सेंटर. अमेरिकेतही झोहोचा मोठा ग्राहक आहे.
मेक इन इंडीया आणि मेक फॉर वर्ल्ड ही पंतप्रधान मोदींची घोषणा प्रत्यक्षात आणण्याचा प्रयोग झोहोने केलेला आहे. श्रीधर वेम्बू यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये या घोषणेचा उल्लेखही केलाय आणि कंपनीबाबत लोकांना माहितीही दिलेली आहे.
हे ही वाचा:
पोस्टे कटेझरी हद्दीतील माओवादी स्मारक गडचिरोली पोलीसांनी केले नष्ट!
मोहसिन नक्वी नरमले, आशिया कप ट्रॉफी यूएई बोर्डाकडे सुपूर्द!
आशिया कपवरून पाकिस्तानातच जुंपली, आफ्रिदीने नक्वीना म्हटले द्या राजीनामा
मेहकरमध्ये १.४३ कोटींचा गुटखा जप्त
विदेशी कंपन्यांप्रमाणे आम्हाला देशात एकाधिकार निर्माण कऱण्याची इच्छा नाही. आमचे एप मेटाच्या एपपेक्षा वेगळे आणि प्रभावी आहे. ते स्वदेशी आहे, सुरक्षित आहे.
अराट्टई हे झोहोचे चॅटींग एप. तामिळ भाषेत या शब्दाचा अर्थ गप्पा असा होता. आपल्या देशात व्हॉट्सएप लोकप्रिय आहे. प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये व्हाट्सएप असतेच. त्यामुळे आपण इतर चॅटींग एपच्या भानगडीत पडत नाही. अराट्टईबद्दल तर अनेक भारतीयांनी ऐकले सुद्धा नसेल.गेल्या तीन दिवसांत या एपचे डाऊनलोड शंभरपट वाढलेले आहे. हा विक्रम आहे.
व्हाट्सएपचा पसारा जगात फार मोठा आहे. जगभरात दिडशे पेक्षा जास्त देशात व्हॉट्सएपचे सुमारे साडे पाच अब्ज डाऊन लोड आहेत. त्यातुलनेत अराट्टईचे डाऊनलोड फक्त ३ हजार होते. ते आता वाढून ३० हजार झालेले आहेत. म्हणजे व्हाट्सएपच्या तुलनेत टीचभर आहेत. परंतु एक गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे की व्हाट्सएपचा सगळ्या जगात पसारा असला तरी त्यांच्या एकूण ग्राहकांच्या तुलनेत भारतात त्यांचे २० टक्के ग्राहक आहेत. आपण सगळे १४० कोटी आहोत. ही आपली मोठी ताकद आहे. ती ताकद एखाद्या कंपनीच्या पाठीशी उभी राहीली तर आपण कोणालाही वाढवू किंवा बुडवू शकतो.
भारताचा स्वत:चा सोशल मीडिया असणे खूप महत्वाचे आहे. हॉलिवूडचे सिनेमे, अमेरिकी वृत्तसंस्था, अमेरिकी आयटी आणि सॉफ्टवेअर कंपन्या ही अमेरीकेची सॉफ्ट पॉवर आहे. अमेरिकेच्या लष्करी ताकदी एवढीच ही ताकद महत्वाची आहे. अमेरिकेचे हितसंबंध जगभरात जपण्याचे काम ही सॉफ्टपॉवर करीत असते. अमेरिकेचा जगभरात जो प्रभाव निर्माण झालेला आहे, तो याच कंपन्यांनी केलेला आहे. अमेरिकी लष्कराचे जगभरात तळ आहेत. परंतु या कंपन्या प्रत्येक देशात आहेत. त्यांची न्यूसंस व्हॅल्यूही मोठी आहे. एखाद्या देशातील सरकारच्या विरोधात वातावरण निर्मितीसाठी, जनतेला भडकवण्यासाठी, अमेरिकेचा एजेंडा रेटण्यासाठी या कंपन्यांचा वापर केला जातो. कालपर्यंत अर्थकारणात जे स्थान तेलाचे होते ते आज डेटाचे राहणार आहे. हा डेटा या कंपन्यांच्या माध्यमातून गोळा केला जातो.
झोहोने या क्षेत्रात अमेरिकी कंपन्यांना आव्हान दिलेले आहे. अर्थात हे सोपे नाही. अमेरिकी कंपन्यांचे आकारमान आज हिमालयासारखे विशाल झालेले आहे, झोहो त्या तुलनेत एखाद्या टेकडीसारखी कंपनी आहे. परंतु एक गोष्ट महत्वाची आहे. अराट्टई तेच काम करते जे व्हाट्सएपच्या माध्यमातून केले जाते. जे तंत्र मेटाकडे आहे, ते झोहोकडेही आहे. ही इथे प्रश्न फक्त वाढती ग्राहक संख्या पेलण्यासाठी तुमची क्षमता वाढवण्याचा आहे. तो काही फार कठीण नाही. सहज शक्य आहे. त्यासाठी आवश्यक पैसा उभे करणे लाख कोटी बाजारमूल्य असलेल्या झोहोला सहज शक्य आहे. सरकार त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहीले तर ही बाब अत्यंत मामुली ठरेल. सरकार त्यांच्या पाठीशी आहे, हे वैष्णव यांनी दाखवून दिलेले आहे. भारतीय म्हणून आपणही आपली ताकद झोहोच्या पाठीशी उभी केली पाहीजे. झोहोने आपल्याला आत्मविश्वास दिलेला आहे की, व्हाट्सएप नसले तरी भविष्यात आपले अडणार नाहीत. आपल्याकडे हक्काचा पर्याय आता निर्माण झाला आहे. भारत आता या क्षेत्रातही सीमोल्लंघनासाठी सज्ज आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)







