पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) पाकिस्तान सरकारविरुद्ध सलग तिसऱ्या दिवशी झालेल्या हिंसक निदर्शनांमध्ये बुधवारी १० नागरिकांचा मृत्यू झाला. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, बाग जिल्ह्यातील धीरकोटमध्ये चार जणांचा मृत्यू झाला, तर मुझफ्फराबादमध्ये चौघांचा आणि मीरपूरमध्ये दोघांचा मृत्यू झाला.
मूलभूत हक्कांच्या मागणीसाठी संयुक्त अवामी कृती समितीच्या नेतृत्वाखाली गेल्या ७२ तासांत पीओकेमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली आहेत. या काळात बाजारपेठा, दुकाने आणि स्थानिक व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहेत, तसेच वाहतूक सेवाही थांबविण्यात आल्या आहेत. दरम्यान, बुधवारी सकाळी निदर्शकांनी दगडफेक केली. मुझफ्फराबादमधील मृत्यूंना पाक रेंजर्सनी केलेल्या गोळीबाराला जबाबदार धरले आहे. निदर्शकांच्या ३८ मागण्या आहेत, ज्यामध्ये पाकिस्तानात राहणाऱ्या काश्मिरी निर्वासितांसाठी राखीव असलेल्या पीओके विधानसभेतील १२ जागा रद्द करणे समाविष्ट आहे. स्थानिकांचा असा युक्तिवाद आहे की यामुळे प्रातिनिधिक प्रशासन कमकुवत होते. आमची मोहीम ७० वर्षांहून अधिक काळ आपल्या लोकांना वंचित ठेवलेल्या मूलभूत हक्कांसाठी आहे. एकतर हक्क द्या नाहीतर लोकांच्या रोषाला सामोरे जा, असे नेते शौकत नवाज मीर म्हणाले.
मीर यांनी पंतप्रधान शेहबाज शरीफ यांच्या सरकारला इशारा दिला आहे की, हा संप ‘प्लॅन ए’ होता. हा संदेश आहे की लोकांचा संयम संपला आहे आणि आमच्याकडे बॅक-अप प्लॅन आणि एक कठोर प्लॅन डी आहे.
हे ही वाचा :
मोहसिन नक्वी नरमले, आशिया कप ट्रॉफी यूएई बोर्डाकडे सुपूर्द!
मेहकरमध्ये १.४३ कोटींचा गुटखा जप्त
घुसखोरीपेक्षा लोकसंख्यात्मक बदल हे मोठं आव्हान
बरेली हिंसाचार: तौकीर रझाचे दोन सहकारी गोळीबारात जखमी, अटक!
अलिकडच्या काही महिन्यांत, अवामी कृती समितीने पाकव्याप्त काश्मीरमध्ये बरीच लोकप्रियता मिळवली आहे. हजारो लोकांना त्यांच्या बॅनरखाली एकत्र केले आहे. या गटाने सुधारणांची मागणी करणारा ३८ कलमी सनद जारी केला आहे. पीओकेमधील लोक वाढत्या महागाईने त्रस्त आहेत. जीवनावश्यक सर्व वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. स्थानिक लोक त्यांच्या सुविधांची तुलना भारतीय काश्मीरमधील सुविधांशी करत आहेत आणि त्यांच्या वाईट परिस्थितीसाठी पाकिस्तानला दोष देत आहेत.







