होर्मुझमधील हल्ल्यापूर्वी पुण्याच्या हेरंब करमरकर यांनी पाठवला होता शेवटचा संदेश

'जीएफएक्स गॅलेक्सी' या व्यापारी जहाजावर झाला होता हल्ला

होर्मुझमधील हल्ल्यापूर्वी पुण्याच्या हेरंब करमरकर यांनी पाठवला होता शेवटचा संदेश

ओमानच्या किनाऱ्याजवळ सायप्रसच्या ध्वजाखालील व्यापारी जहाजावर झालेल्या इराणी क्षेपणास्त्र हल्ल्यात मृत्यू झालेल्या भारतीय खलाशी हेरंब करमरकर यांनी संकट टळल्याचा समज करून आपल्या कुटुंबीयांना शेवटचा संदेश पाठवला होता. मात्र, काही क्षणांतच त्यांचे जहाज होर्मुझ सामुद्रधुनीत हल्ल्याचे लक्ष्य ठरले.

पुण्यातील ३० वर्षीय हेरंब करमरकर हे जहाजावरील मरीन इंजिनिअर होते. कुटुंबीयांच्या माहितीनुसार, जहाजाने आखाताचा धोकादायक भाग सुरक्षितपणे पार केल्याचे त्यांनी संदेशाद्वारे कळवले होते. तोच त्यांच्या आयुष्यातील शेवटचा संदेश ठरला. रविवारी ओमानच्या किनाऱ्याजवळ होर्मुझ सामुद्रधुनीत ‘जीएफएक्स गॅलेक्सी’ या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्यानंतर काही भारतीय खलाशी बेपत्ता झाले होते. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, जहाजावरील १० भारतीयांची सुरक्षित सुटका करण्यात आली असून एक जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले होते.

बुधवारी हेरंब करमरकर यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या मृत्यूची अधिकृत पुष्टी केली. हेरंब यांचे सासरे विवेक टंडन यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले, “तो अवघा ३० वर्षांचा होता. आमची केंद्र सरकारकडे एकच विनंती आहे की, त्यांचा मृतदेह सुरक्षित अवस्थेत आम्हाला सुपूर्द करून मायदेशी आणण्यात यावा.”

दरम्यान, भारताने या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून पश्चिम आशियातील व्यापारी जहाजांवर सातत्याने होत असलेल्या हल्ल्यांबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, ओमानमधील भारतीय दूतावास संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून ओमानच्या अधिकाऱ्यांसोबत शोध आणि बचाव मोहिमेत समन्वय साधत आहे.

हे ही वाचा:

मुंबईमधील कोस्टल रोडच्या बोगद्यात धावत्या कारला आग

बंगालमधील सरकार बदलल्यामुळे तस्लिमा नसरिन १९ वर्षांनी कोलकात्यात येणार

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या निष्क्रियतेमुळे यूएनवरील विश्वास ढासळतोय

गडकरींची बदनामी, चार एन्फ्लुअर्सवर गुन्हा

भारतीय दूतावासाने सामाजिक माध्यमावरील निवेदनात म्हटले आहे की, दूतावासाचे अधिकारी ओमान प्रशासन, जहाज व्यवस्थापन आणि संबंधित संस्थांच्या सातत्यपूर्ण संपर्कात असून भारतीय खलाशांना सर्वतोपरी मदत पुरवली जात आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडच्या माहितीनुसार, सायप्रसच्या ध्वजाखालील जीएफएस गॅलेक्सी या कंटेनर जहाजावर होर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवास करत असताना इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (आयआरजीसी)ने हल्ला केला. या हल्ल्यानंतर जहाजावरील एका कर्मचाऱ्याचा बेपत्ता झाल्याची माहिती देण्यात आली.

होर्मुझ सामुद्रधुनी हा जगातील सर्वाधिक महत्त्वाच्या सागरी व्यापार मार्गांपैकी एक असून जगातील सुमारे २० टक्के तेलवाहतूक याच मार्गाने होते. त्यामुळे या परिसरातील वाढत्या तणावामुळे जागतिक ऊर्जा सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे.

Exit mobile version