कफ सिरप प्यायल्यामुळे देशभरात बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब घडली असून यावरून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणावरून खळबळ उडालेली असताना या प्रकरणात जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) चिंता व्यक्त करत भारताकडे उत्तर मागितले होते. संबंधित कफ सिरप इतर देशांमध्ये निर्यात करण्यात आले होते का, असा सवाल जागतिक आरोग्य संघटनेने उपस्थित केला होता. यावर आता भारताने उत्तर दिले आहे.
सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) ने जागतिक आरोग्य संघटनेला कळवले आहे की कोल्ड्रिफ, रेस्पिफ्रेश टीआर आणि रिलाइफ हे तीन कफ सिरप परत मागवण्यात आले आहेत. शिवाय या तिन्ही कफ सिरपचे उत्पादन थांबवण्यात आले आहे. तर, यापैकी कोणतेही उत्पादन भारतातून निर्यात केले गेले नाही, असे नियामकाने स्पष्ट केले आहे. पीटीआयने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
हे ही वाचा..
रावळपिंडी चिकन टिक्का, मुझफ्फराबाद कुल्फी… ‘एअर फोर्स डे’निमित्तच्या मेनूची चर्चा
देशाची सेवा करणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे
कोल्ड्रिफ या कफ सिरपमध्ये डायथिलीन ग्लायकोल (DEG) आणि इथिलीन ग्लायकोल (EG) असे विषारी पदार्थ असल्याचे आढळून आले. या सिरपचे सेवन केल्यानंतर राजस्थान, मध्य प्रदेशातील बालकांचा मृत्यू झाल्याने देशभरात खळबळ उडाली. यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने भारतीय अधिकाऱ्यांना विचारले की, संबंधित कफ सिरप इतर देशांमध्ये निर्यात करण्यात आले होते का? भारतीय अधिकाऱ्यांकडून अधिकृत प्रतिसाद मिळाल्यानंतर WHO जागतिक वैद्यकीय उत्पादनांचा इशारा जारी करण्याचा निर्णय घेणार होती. दरम्यान, कोल्ड्रिफ कफ सिरपची निर्मिती करणाऱ्या स्रेसन फार्मास्युटिकल्सच्या मालकाला अटक करण्यात आली आहे. माहितीनुसार, मालक रंगनाथन याला बुधवारी रात्री चेन्नई येथे अटक करण्यात आली.







