इंडोनेशियातील मदुरा बेटाजवळ रविवारी भीषण सागरी दुर्घटना घडली. प्रवाशांनी भरलेल्या एका फेरीला अचानक आग लागल्याने काही क्षणांतच संपूर्ण जहाज धुराच्या लोटांनी वेढले गेले. आगीने रौद्ररूप धारण करताच जहाजावर एकच गोंधळ उडाला. जीव वाचवण्यासाठी अनेक प्रवाशांनी थेट समुद्रात उड्या मारल्या, तर काहीजण जहाजावरच अडकून पडले. या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत किमान पाच जणांचा मृत्यू झाला असून ४१ जण बेपत्ता आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही प्रवासी फेरी नियोजित मार्गाने प्रवास करत असताना अचानक आग लागली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी काही मिनिटांतच ज्वाळांनी संपूर्ण फेरीला वेढा घातला. धुरामुळे आणि आगीच्या तीव्रतेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेकांनी लाइफ जॅकेटच्या मदतीने समुद्रात उड्या मारत जीव वाचवण्याचा प्रयत्न केला.
हे ही वाचा:
बंगालमध्ये मला एक छोटं घरही मिळू शकलं नाही! मला हाकलण्यात आलं!!
‘मोदीजी. तुम्ही आमच्या मुलीला नवे जीवन दिलेत!’
पंतप्रधान मोदी ‘अपयशी’; १२ वर्षात हुकूमशहा बनले नाहीत!
घटनेची माहिती मिळताच इंडोनेशियाचे तटरक्षक दल, नौदल आणि राष्ट्रीय शोध-बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. समुद्रात मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू करण्यात आली असून हेलिकॉप्टर, बचाव नौका आणि गोताखोरांच्या मदतीने बेपत्ता प्रवाशांचा शोध घेतला जात आहे. आतापर्यंत अनेक प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले असले तरी ४१ जणांचा अद्याप कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही.
या दुर्घटनेनंतर इंडोनेशिया प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले असून फेरीला आग नेमकी कशामुळे लागली, याचा तपास सुरू करण्यात आला आहे. बचावकार्य अद्याप सुरू असून बेपत्ता प्रवाशांचा शोध लागेपर्यंत मोहीम सुरूच राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. या भीषण दुर्घटनेने संपूर्ण इंडोनेशियात हळहळ व्यक्त होत असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.







