पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये कमालीचा तणाव वाढला आहे. भारताने थेट या हल्ल्यासाठी पाकिस्तानवर बोट ठेवल्यामुळे पाकिस्तानची भांबेरी उडाली आहे. भारताकडून लष्करी कारवाई होऊ शकते अशी भीती पाकिस्तानला असून पाकिस्तानकडून यासाठी हालचाली सुरू आहेत. यातून बचावण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव सुरू आहे. अशातच पाकिस्तानने आता आखाती देशांपुढे मदतीसाठी हात पसरल्याचे समोर आले आहे.
दहशतवादी हल्ल्यानंतर राजनैतिक पातळीवर भारताने पाकिस्तानची कोंडी केली आहे. यादरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी आखाती राष्ट्रांच्या राजदूतांची भेट घेतली आणि त्यांचा पाठिंबा मागितला, अशी माहिती समोर आली आहे. सौदी, कुवेत आणि युएईच्या राजदूतांसोबतच्या वेगवेगळ्या बैठकांमध्ये, शाहबाझ शरीफ यांनी त्यांना २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याबाबत इस्लामाबादच्या भूमिकेची माहिती दिली. तर, भारताने या हल्ल्यासाठी पाकिस्तानला जबाबदार धरले आहे आणि हा आरोप इस्लामाबादने नाकारला आहे.
पहलगाम पर्यटक हल्ल्यात पाकिस्तानच्या भूमिकेवर भारताने लष्करी कारवाईची योजना आखल्याचे विश्वसनीय वृत्त असल्याचे जाहीर भाष्य एका पाकिस्तानी मंत्र्यांनी केले होते. यानंतर पंतप्रधान शाहबाझ शरीफ आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांना अमेरिकन अधिकारी आणि इतर राजनयिकांचे फोन आले, असे शरीफ यांच्या कार्यालयाने आणि पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. शरीफ यांच्या कार्यालयाने म्हटले आहे की, त्यांनी सौदी अरेबियासह बंधू देशांना भारतावर तणाव कमी करण्यासाठी दबाव आणण्याचे आवाहन केले आहे. तसेच दक्षिण आशियातील शांतता आणि स्थैर्यासाठी पाकिस्तानच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे.
हे ही वाचा..
राम मंदिर परिसरात संग्रहालय आणि उद्यानाची योजना
‘वेव्स बाजार’ने पहिल्या ३६ तासांत किती कमवले ?
केदारनाथमध्ये किती भक्तांनी घेतले दर्शन, जाणून घ्या !
सर्जिकल स्ट्राईकवर काँग्रेसकडून पुन्हा प्रश्नचिन्ह; भाजपाकडून जोरदार प्रत्युत्तर
शरीफ यांनी युएईचे राजदूत हमाद ओबैद इब्राहिम सलेम अल-जबी यांना सांगितले की पर्यटकांवरील हल्ल्यात पाकिस्तानचा कोणताही सहभाग नाही आणि त्यांनी विश्वासार्ह, पारदर्शक आणि तटस्थ आंतरराष्ट्रीय चौकशीत सामील होण्याची ऑफर दिली आहे, असे शरीफ यांच्या कार्यालयाने सांगितले. सौदी राजदूत नवाफ बिन सईद अल-मलिकी यांच्याशी झालेल्या भेटीत पंतप्रधानांनी त्यांना ताज्या परिस्थितीची माहिती दिली. प्रतिसादात, सौदी राजदूत म्हणाले की, या प्रदेशात शांतता आणि सुरक्षिततेसाठी राज्य पाकिस्तानसोबत काम करू इच्छित आहे, असे निवेदनात म्हटले आहे.







