जम्मू- काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर या हल्ल्याला भारताने चोख प्रत्युत्तर द्यावे अशी भूमिका कॉंग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी घेतली आहे. मात्र, असे असतानाही या हल्ल्यासंबंधीची वादग्रस्त वक्तव्ये कॉंग्रेस नेत्यांकडून केली जात असून पक्षाने मात्र यातून हात वर केले आहेत. नेत्यांची वैयक्तिक मते असल्याचे म्हणत दूर राहणे पसंत केले आहे. दरम्यान, काँग्रेसचे खासदार आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्या नव्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
काँग्रेस खासदार आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांनी २०१९ च्या सर्जिकल स्ट्राईकच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. याचा कोणताही पुरावा नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना चन्नी म्हणाले की, पहलगाम हल्ल्याच्या १० दिवसांनंतरही सरकारने काहीही केलेले नाही. संपूर्ण देश पाकिस्तानविरुद्ध काय कारवाई केली जाते याकडे लक्ष ठेवून आहे. लोक तथाकथित ५६ इंचाच्या छातीने कारवाई करण्याची वाट पाहत आहेत. सरकारने जलद प्रतिसाद द्यावा आणि निकाल द्यावेत अशी आमची इच्छा आहे, असे ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, २०१९ च्या पुलवामा हल्ल्यात ४० सीआरपीएफ जवान हुतात्मा झाले होते. पण पाकिस्तानमध्ये कुठे स्ट्राइक झाले आणि कुठे लोक मारले गेले हे कधीच पाहिले नाही. जर कोणी आपल्या देशात बॉम्ब फेकला तर लोकांना कळणार नाही का? ते पाकिस्तानविरुद्ध सर्जिकल स्ट्राइक केल्याचा दावा करतात पण काहीही झाले नाही. सर्जिकल स्ट्राइक कुठेही दिसले नाहीत आणि त्यांच्याबद्दल कोणालाही माहिती नव्हती, असं वादग्रस्त विधान करत त्यांनी सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
हे ही वाचा :
गोव्यातील लैराई देवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत सात जणांचा मृत्यू
‘लव्ह जिहाद’च्या आरोपाखाली असलेल्या लोकांची नसबंदी करा!
पाकचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचे युट्युब अकाउंट भारतात ब्लॉक
डॉलरच्या तुलनेत रुपया चमकला, सात महिन्यांतली उच्चतम पातळी गाठली!
यानंतर चरणजित सिंग चन्नी यांच्यावर भाजपाने जोरदार निशाणा साधला आहे. भाजपचे प्रवक्ते सीआर केशवन यांनी त्यांच्यावर सशस्त्र दलांचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. दिल्लीचे मंत्री आणि भाजप नेते मनजिंदर सिंग सिरसा यांनीही भारतीय लष्कर आणि हवाई दलावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याच्या चन्नी यांच्या वक्तव्याचा निषेध केला. “काँग्रेसने पुन्हा एकदा आपल्या सैन्यावर आणि आपल्या हवाई दलावर प्रश्न उपस्थित केले आहेत. चरणजित सिंह चन्नी म्हणाले आहेत की त्यांचा सर्जिकल स्ट्राईकवर विश्वास नाही आणि त्यांना पुरावे हवे आहेत. ही कोणत्या प्रकारची मानसिकता आहे? राहुल गांधी वारंवार आपल्या सैन्यावर आणि हवाई दलावर प्रश्न उपस्थित करतात आणि त्यांना खोटे म्हणतात,” असा दावा सिरसा यांनी केला.