यंदाच्या आषाढी वारीच्या नियोजनासाठी प्रथमच ‘बीबीपीपीडीआर’ (ब्रॉडबॅंड पब्लिक प्रोटेक्टर अँड डिझास्टर रिलीफ) या आधुनिक संप्रेषण प्रणालीचा वापर केला जाणार आहे. या प्रणालीसाठी सुमारे तीन कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, निविदा प्रक्रियेनंतर संबंधित मोबाईल कंपनीकडे हे काम सोपविण्यात येणार आहे.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात सुमारे ३० ते ३५ लाख भाविक येण्याचा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. एवढ्या मोठ्या गर्दीत मोबाईल नेटवर्कवर ताण येत असल्याने प्रशासनातील विविध यंत्रणांमध्ये समन्वय राखणे अवघड होते. ही अडचण दूर करण्यासाठी ‘बीबीपीपीडीआर’ प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे.
या प्रणालीच्या माध्यमातून पंढरपूर शहरासह चार ते पाच किलोमीटर परिसरातील प्रशासन, पोलीस, आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन आणि अन्य विभागांना अखंड संपर्कात राहून समन्वय साधता येणार आहे. सुमारे ५०० ते ५५० मोबाईल उपकरणे या प्रणालीशी जोडण्यात येणार असून, आपत्कालीन परिस्थितीतही प्रभावी संवाद कायम ठेवणे शक्य होणार आहे.
देशात प्रथमच आषाढी वारीसारख्या मोठ्या धार्मिक सोहळ्यात या प्रणालीचा प्रायोगिक वापर केला जात आहे. यापूर्वी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर एका क्रिकेट सामन्यादरम्यान या प्रणालीचा वापर करण्यात आला होता.
हे ही वाचा:
शेवपुरीसाठी बस २० मिनिटे रस्त्यातच
व्हिएतनाममध्ये भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली
“काश्मीरमध्ये आमचेच दहशतवादी लढले आणि…”, हिजबुल कमांडरच्या कबुलीने पाकची नाचक्की
एकेकाळी ‘नकोशी’ असणारी वाघीण बनली गिरडच्या जंगलाची ‘राणी’
जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी सांगितले की, “आषाढी वारीत लाखो भाविकांच्या गर्दीमुळे मोबाईल नेटवर्कवर ताण येतो आणि प्रशासनातील समन्वयात अडथळे निर्माण होतात. ही बाब लक्षात घेऊन यंदा प्रथमच ‘बीबीपीपीडीआर’ प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. यामुळे आपत्कालीन परिस्थितीतही विविध यंत्रणांमध्ये अखंड संपर्क राहून नियोजन अधिक प्रभावी होईल.”







