रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली असलेल्या भारतावर निर्बंधांद्वारे दबाव आणण्याचा कोणताही प्रयत्न हा यशस्वी न होता तो उलटेल. त्यांनी नवी दिल्लीच्या सामरिक स्वायत्ततेला पाठिंबा दिला आणि सार्वभौम राष्ट्रांना त्यांचे संरक्षण व आर्थिक भागीदार निवडण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे, यावर जोर दिला. सेंट पीटर्सबर्ग आंतरराष्ट्रीय आर्थिक मंच (SPIEF) येथे ‘इंडिया टुडे’च्या समूह संपादक गीता मोहन यांच्या प्रश्नांना उत्तर देताना पुतिन म्हणाले की, भारताने सातत्याने आपल्या राष्ट्रीय हितांना अनुसरून धोरणे अवलंबली आहेत आणि रशियासोबतच्या संबंधांवरून बाह्य दबाव आला तरीही भारत यापुढेही असेच करत राहील.
“भारत नेहमीच एक सार्वभौम देश म्हणून वागतो आणि पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली निर्बंधांच्या कोणत्याही संभाव्य धमक्या तात्काळ उलटतील,” असा विश्वास पुतिन यांनी व्यक्त केला. पुतिन यांनी खुलासा केला की, रशियाने यापूर्वी भारतासोबत एसयू-५७ लढाऊ विमानांचा समावेश असलेला एक संयुक्त कार्यक्रम प्रस्तावित केला होता, परंतु ते सहकार्य प्रत्यक्षात न आल्याने अखेरीस त्यांनी हे विमान स्वतंत्रपणे विकसित केले. “Su-57 हे एक खूप चांगले विमान आहे, कदाचित सध्या जगातील सर्वात आधुनिक आणि अद्ययावत विमान आहे,” असे पुतिन म्हणाले. आम्ही एकत्र मिळून ते करण्याचा प्रस्ताव दिला होता. अर्थात, ते जमले नाही, पण आम्ही ते स्वतःहून केले आणि आम्ही Su-57 विकायला तयार आहोत, असे ते पुढे म्हणाले.
पुतिन यांनी भारत-रशिया संरक्षण सहकार्य अद्वितीय असल्याचे वर्णन केले, कारण ते केवळ खरेदी-विक्रीच्या व्यवहारांपुरते मर्यादित नाही. “भारतीय मित्रांसोबतचे आमचे संबंध वैशिष्ट्यपूर्ण आहेत, कारण आमच्यातील परस्पर विश्वासामुळे आम्ही केवळ व्यापारावर किंवा केवळ खरेदी-विक्रीवर लक्ष केंद्रित करत नाही,” असे ते म्हणाले. आम्ही संयुक्त संशोधन आणि विकासावरही लक्ष केंद्रित करत आहोत. उदाहरण म्हणून, पुतिन यांनी ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र कार्यक्रमाकडे लक्ष वेधले, जो भारतीय आणि रशियन तज्ञांनी संयुक्तपणे विकसित केला असून दोन्ही देशांमधील सर्वात यशस्वी संरक्षण सहकार्यांपैकी एक ठरला आहे.
हे ही वाचा:
भातखळकर करून गेले, श्रेय लाटण्यासाठी सुर्वे आले!
सऊदी अरेबियाची नवी समुद्री व्यापार वाट
पंतला संधी, तर ‘या’ युवा खेळाडूवर मोठा विश्वास
एसयू-५७ किंवा एस-५०० सारख्या रशियन संरक्षण प्रणाली खरेदी केल्यास भारताला अमेरिकेकडून निर्बंधांच्या दबावाला सामोरे जावे लागू शकते का, असे विचारले असता, पुतिन म्हणाले की, नवी दिल्लीने सातत्याने राष्ट्रीय हिताच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र परराष्ट्र धोरण अवलंबले आहे. “भारत एक सार्वभौम देश आहे आणि त्यांना सर्वात अद्ययावत व स्वतःसाठी सर्वात योग्य वाटणारी उत्पादने निवडण्याचे स्वातंत्र्य आहे,” असे पुतिन म्हणाले.







