२२ एप्रिल रोजी झालेल्या भीषण पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत असताना, लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफिज सईदचा मुलगा तल्हा सईद याने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर त्याच्या वडिलांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप केला आहे.
अलीकडे समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये, लाहोरमधील एका सभेत बोलताना सईद म्हणाला की, त्याचे वडील पाकिस्तानमध्ये तुरुंगात “शांततेत जीवन जगत आहेत” आणि “मोदी त्यांना मारण्याचा कट करत आहेत.”
तल्हा सईद, स्वतः घोषित दहशतवादी असून भारताला हव्या असलेल्या ५७ दहशतवाद्यांच्या यादीत ३२ व्या क्रमांकावर आहे. ५ मे रोजी त्याने हे विधान केले. त्याने पहलगाम हल्ल्याला कमी लेखत हे ‘मोदीनी घडवलेले नाटक आहे, असे म्हटले.
हे ही वाचा:
आम्ही एकमेकांवर हल्ला नाही करणार – तालिबान
‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर धर्मशाळा विमानतळ बंद, आयपीएल सामन्याबाबत प्रश्नचिन्ह?
सभेदरम्यान तल्हा सईदने सिंधू जलसंधी निलंबनावरून पंतप्रधान मोदींना धमकी दिली. तो म्हणाला, “मोदी, अगर तू पानी बंद करेगा तो हम तेरी सांस बंद करेंगे“ (मोदी, जर तुम्ही आमचे पाणी बंद केलेत तर आम्ही तुमचा श्वास बंद करू).
त्याचवेळी, हाफिज सईद यांच्या जुन्या भडकावणाऱ्या भाषणांचे ध्वनिमुद्रणही स्टेजवरून वाजवण्यात आले, ज्यात तो अशाच प्रकारच्या धमक्या देत होता.
मोदी अगर तू पानी बंद करेगा, इंशाल्लाह तो हम तेरी सांस बंद करेंगे. इन दरियाओं में सिर्फ खून बहेगा, अशा धमक्या तो देत होता.
पाकिस्तानमध्ये भारतविरोधी निदर्शने
ही सभा पाकिस्तानमध्ये पाकिस्तान मरकजी मुस्लिम लीग (PMML) या पक्षाद्वारे घेतलेल्या भारतविरोधी निदर्शनांच्या मालिकेचा एक भाग होती. हा पक्ष बंदी घातलेल्या जमात-उद-दावा (JuD) या संघटनेचा राजकीय अवतार मानला जातो, ज्याचा संबंध हाफिज सईदशी आहे.
PMML ने लाहोर, कराची, इस्लामाबाद, रावळपिंडी, फैसलाबाद, गुजरांवाला आणि हाफिजाबाद यांसारख्या प्रमुख पाकिस्तानी शहरांमध्ये मोर्चे काढून हाफिज सईदच्या सुटकेची मागणी केली आणि भारतावर “पाण्याच्या आक्रमणाचा” आरोप केला.
PMML ला लष्कर-ए-तैयबा (LeT) या आंतरराष्ट्रीय स्तरावर बंदी घातलेल्या संघटनेचे आजचे एक रुप मानले जाते. बंदी असूनही LeT ने पाकिस्तानी राजकारणात प्रवेश करून आपले महत्त्व टिकवण्याचा प्रयत्न केला आहे.
हाफिज सईद, LeT आणि JuD चा संस्थापक व २००८ च्या मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार, PMML शी जवळून संबंधित आहे. त्याचा मुलगा तल्हा सईद याने २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत लाहोरच्या NA-१२२ मतदारसंघातून PMML तिकिटावर निवडणूक लढवली होती. मात्र त्याला फक्त २,०४१ मते मिळाली आणि तो सहाव्या क्रमांकावर राहिला, यामुळे पाकिस्तानमध्येही सईदच्या टोकाच्या राजकारणाची व्यापक नकारात्मकता दिसून आली.
हाफिज सईदवर २००८ च्या मुंबई हल्ल्यात १६६ लोकांचा बळी घेतल्याचा मुख्य आरोप आहे. तो पाकिस्तानमध्ये दहशतवाद्याना अर्थपुरवठा केल्याप्रकरणी तुरुंगात आहे. तरीदेखील तो आपल्या अनुयायांद्वारे व राजकीय माध्यमांद्वारे (PMML) आपला वैचारिक प्रभाव कायम ठेवत आहे.
भारताने २२ एप्रिलच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर कडक प्रतिक्रिया दिली आहे, ज्यात २६ लोक, बहुतेक पर्यटक, मृत्युमुखी पडले. नवी दिल्लीने इस्लामाबादविरोधात अनेक उपाययोजना जाहीर केल्या आहेत — ज्यात सिंधू जलसंधीचा निलंबन, अटारी-वाघा सीमेचा एकमेव स्थलसंपर्क बंद करणे, पाकिस्तानसाठी हवाई क्षेत्र बंद करणे आणि राजनयिक संबंध कमी करणे यांचा समावेश आहे.