पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी स्थळांवर एअर स्ट्राईक केला. भारताच्या या अचूक कारवाईचे देशासह जगभरातून कौतुक करण्यात आले. काँग्रेस खासदार शशी थरूर यांनीही भारतीय सैन्याचे आणि भारताच्या भूमिकेचे कौतुक करत स्तुतिसुमने उधळली आहेत. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत करण्यात आलेल्या हल्ल्यांचे कौतुक करताना खासदार शशी थरूर म्हणाले की, भारताने खूप विचार आणि मोजमाप करून स्वतःचे काम केले आहे. यातून दहशतवाद्यांना असा संदेश देण्यात आला आहे की, दहशतवादाची किंमत मोजावी लागते.
शशी थरूर म्हणाले की, रस्त्यांवर नागरिक नसताना, रात्री १ वाजल्यानंतर अचूक हल्ले करण्यात आले होते. तसेच नागरी भागातील संभाव्य नुकसान टाळण्यासाठी केवळ दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यासाठी काळजीपूर्वक ठिकाणे निवडण्यात आली होती. “आम्ही पाकिस्तानी लष्करी सुविधांवर किंवा सरकारी सुविधांवर हल्ला केला नाही याचा अर्थ असा नाही की लष्कराचा (पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी) काहीही संबंध नाही. उलट, आम्हाला असे वाटते की, या दहशतवाद्यांना प्रशिक्षण, वित्तपुरवठा आणि मार्गदर्शन करण्यात लष्कराचा मोठा हात होता. परंतु, तरीही, हे पाहण्यात किंवा दीर्घकाळ चालणाऱ्या युद्धात सुरुवातीचा परिणाम म्हणून हे दाखवण्यात आम्हाला रस नाही. हेचं दाखवण्यासाठी, आम्ही फक्त २६ निष्पाप नागरिकांच्या मृत्युचा बदला घेण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली,” असे थरूर म्हणाले. पुढे शशी थरूर असेही म्हणाले की, चेंडू आता पाकिस्तानच्या कोर्टात आहे आणि जर त्यांनी आक्रमक पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला तर भारत तयार आहे आणि त्याला प्रत्युत्तर देईल.
काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना न्याय देण्याचे आश्वासन दिले होते. सरकारने सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य दिले आणि १५ दिवसांच्या आत भारतीय सैन्याने हवाई हल्ला केला. शशी थरूर म्हणाले की, पहलगाममध्ये दहशतवादी कट रचणाऱ्या पाकिस्तानला भारताने स्पष्ट संदेश दिला आहे. त्यांनी सांगितले की, आम्ही स्वसंरक्षणार्थ कारवाई केली आहे. देशाच्या सैन्याचा अभिमान असल्याचेही त्यांनी सांगितले. शशी थरूर म्हणाले की, सैन्याने खरोखरच खूप चांगले आणि उत्तम काम केले आहे.
हे ही वाचा :
राज ठाकरे काय बोलतात याला काही महत्व नाही!
हनुमानाच्या आदर्शांचं पालन करत घेतला बदला
ऑपरेशन सिंदूर म्हणजे भारताकडून जगाला दिला गेलेला दहशतवादाविरोधातला स्पष्ट संदेश
शशी थरूर म्हणाले की, या हवाई हल्ल्यात भारतीय सैन्याची दूरदृष्टीही दिसून येते. सैन्याने फक्त दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवरच लक्ष ठेवले. लष्करी आणि सरकारी इमारतींवर कोणताही हल्ला झाला नाही. यामुळे सामान्य नागरिकांना होणारे नुकसान कमी होण्यासही मदत झाली आहे. थरूर म्हणाले की, या कारवाईचा अर्थ असा नाही की दीर्घ संघर्ष सुरू होईल. त्याचा उद्देश असा आहे की पाकिस्तानने हे समजून घ्यावे की त्याला दहशतवाद्यांसाठी त्यांची भूमी वापरण्यापासून रोखले जाईल.