पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारताने आज बदला घेतला. ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे ९ तळ उध्वस्त करून टाकले. भारताच्या कारवाईचे देशभरात कौतुक होत असताना मनसे प्रमुख राज ठाकरेंची नकारात्मक प्रतिक्रिया समोर आली आहे. ‘दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही,’ असे राज ठाकरे म्हणाले आहेत. दरम्यान, राज ठाकरेंच्या प्रतिक्रियेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे.
“पहलगामला जो हल्ला झाला, मी त्याच्यावर पहिलं टि्वट केले आहे, ज्यांनी हल्ला केलाय, त्या अतिरेक्यांना, दहशतवाद्यांना कठोरात कठोर पुढच्या पिढ्यांना लक्षात राहिलं असा धडा शिकवला पाहिजे. दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही” अशी पाकिस्तानातील एअर स्ट्राइकनंतर राज ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.
यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ते काय म्हणत आहेत, याला काही महत्व नाही आहे. संपूर्ण भारत या कारवाईच्या पाठीशी उभा, स्वागत करतो आहे. संपूर्ण जग भारताची व्हा व्हाई करते आहे आणि भारताच्या पाठीशी उभा आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले.
प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, पहलगाममध्ये आमच्या बांधवाना अतिशय भयानक पद्धतीने मारण्यात आले होते आणि त्याचा संताप संपूर्ण भारतीयांमध्ये होता. भारताच्या कारवाईमुळे आज निश्चितपणे त्यांना समाधान वाटत आहे. पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले होते कि अशी घटना सहन केली जाणार नाही, याचे उत्तर दिले जाईल. आणि आज अखेर भारतीय सेनेने एक ताकदवर उत्तर दिले आहे.
हे ही वाचा :
भारताने करतारपूर कॉरिडोर केला बंद
विवेक ओबेरॉय म्हणतो, अश्रूंचा बदला घेतला
ऑपरेशन सिंदूर म्हणजे भारताकडून जगाला दिला गेलेला दहशतवादाविरोधातला स्पष्ट संदेश
अजित डोभाल यांनी अनेक देशांना कोणती माहिती दिली ?
मुंबईवर हल्ला करणाऱ्या हाफिज सईद, डेव्हिड हेडली अशांचे ज्याठिकाणी प्रशिक्षण झाले ते अड्डे देखील नष्ट करण्यात आले आहेत. हा नवीन भारत असून अशा प्रकारचे हल्ले सहन करणार नसल्याचे दाखवून दिले आहे. भारताने गेल्या १३-१४ दिवसांमध्ये सर्व देशांशी संपर्क करून पहलगाम मधील घटनेत पाकिस्तान कसा दोषी आहे याचे पुरावे दिले, हे दहशतवादी कसे पाक प्रशिक्षित होते याची माहिती दिली. त्यामुळे संपूर्ण जग आपल्या पाठीशी उभा आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले.