स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या गॅसने भरलेली दोन भारतीय जहाजे होर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवास करत असून, पुढील काही दिवसांत ती जहाजे भारतात पोहोचणार आहेत. यामुळे भारतातील एलपीजी तुटवड्यात काही प्रमाणात दिलासा मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे. शिप-ट्रॅकिंग डेटानुसार ‘जग वसंत’ आणि ‘पाइन गॅस’ ही जहाजे सुरक्षित मार्गाची परवानगी मिळाल्यानंतर या धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या होर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवास करत आहेत. ही जहाजे लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस (एलपीजी) वाहून आणत असून, भारतात स्वयंपाकासाठी याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.
सोमवारी सकाळी या दोन्ही जहाजांनी आपला प्रवास सुरू केला. यूएईच्या किनाऱ्यावरून निघाल्यानंतर ही जहाजे इराणच्या किनाऱ्यालगत केशम आणि लारक बेटांजवळ पोहोचली. या संवेदनशील मार्गावरून प्रवास करताना खबरदारी म्हणून अनेक जहाजांप्रमाणेच या जहाजांनीही आपल्या ट्रॅकिंग सिस्टीममध्ये भारतीय मालकी दर्शवली होती. अहवालानुसार, जर प्रवासात कोणताही अडथळा आला नाही, तर ही जहाजे सोमवारी संध्याकाळपर्यंत ओमानच्या आखातात पोहोचण्याची शक्यता आहे. होर्मुझ सामुद्रधुनी पार करण्यासाठी सुमारे १४ तासांचा कालावधी लागतो.
या सर्व घडामोडी अशा वेळी घडत आहे, जेव्हा तेल आणि गॅस वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा जागतिक मार्ग असलेली ही सामुद्रधुनी फेब्रुवारीच्या अखेरीस झालेल्या अमेरिका आणि इस्रायली हल्ल्यांनंतर वाढलेल्या तणावामुळे प्रभावित झाली आहे. त्यानंतर इराणने या जलमार्गावरील हालचालींवर मोठ्या प्रमाणात निर्बंध घातले असून, चर्चेनंतर भारतासह काही मोजक्या देशांच्या जहाजांनाच प्रवासाची परवानगी दिली जात आहे.
हे ही वाचा:
मध्यपूर्वेतील तणाव वाढल्याने शेअर बाजार कोलमडला
‘इराणने इस्रायलच्या नागरिकांच्या सामुहिक हत्येचा प्रयत्न केला’
ChatGPT च्या वापरकर्त्यांना दिसणार जाहिराती
शिपिंग पॅटर्नवरून असे दिसून येते की, इराण जहाजांना आपल्या किनाऱ्यालगतून जाण्याचे निर्देश देत वाहतूक नियंत्रित करत आहे. याउलट, ओमानजवळील सामान्य मार्ग धोकादायक मानला जात असून, या महिन्याच्या सुरुवातीला एका जहाजावर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. ‘जग वसंत’ आणि ‘पाइन गॅस’ ही दोन्ही जहाजे फेब्रुवारीच्या अखेरीस, संघर्ष तीव्र होण्यापूर्वीच, पर्शियन आखातात दाखल झाली होती. ‘जग वसंत’ने कुवैतमधून एलपीजी भरले होते, तर ‘पाइन गॅस’ने यूएईतील रुवैस येथून आपला माल घेतला होता. तणावपूर्ण परिस्थितीमुळे ही जहाजे या भागात अडकून पडली होती.







