मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सनसनाटी आरोप केले. या आरोपांनंतर देशभर या विषयाची चर्चा सुरु झाली. या विषयीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना विचारले असता “फक्त परमबीर सिंह नाही तर इतरही अधिकाऱ्यांची पत्र आहेत.” असा गौप्यस्फोट शहा यांनी केला आहे. यामुळेच अमित शहांकडे आणखी काही लेटर बॉम्ब असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे ह्याला दर महिन्याला १०० कोटी रुपये पोहोचवण्यास सांगितल्याचा दावा मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून हा खळबळजनक दावा केला. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे ह्याला वसुलीचे काम दिल्याचे या पत्रात म्हटले आहे. या पत्राने देशभर खळबळ उडवून दिली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाराष्ट्र सरकार गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यामागे खंबीरपणे उभे असल्याचे दिसत आहे. या प्रकरणावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना विचारले असता त्यांनी महाराष्ट्र सरकारला नैतिकतेची आठवण करून दिली.
हे ही वाचा:
बेअब्रु सरकार, रया गेलेले पवार
भाजपाच्या आरोपांना उत्तरे द्या नवाब मलिक, भ्रमिष्टा सारखे बोलू नका
‘पेन ड्राईव्ह’ घेऊन फडणवीस दिल्लीत
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मंगळवारी पश्चिम बंगालमध्ये मेदिनीपूर भागात प्रचार रॅली करत होते. यावेळी ‘आज तक’ वाहिनीने त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी शहा ह्यांना महाराष्ट्रातील लेटर बॉम्बविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी फक्त आयुक्त परमबीर सिंहच नाही तर इतरही काही अधिकाऱ्यांनी पत्र लिहिले आहे असा खळबळजनक दावा अमित शहांनी केला आहे. हा राज्य सरकारच्या नैतिकतेचा प्रश्न आहे आणि महाराष्ट्र सरकारने नैतिकता दाखवली पाहिजे असे देखील शहा यांनी संगीतले.