गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात प्रहार संघटनेचे बच्चू कडू हे शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा होत्या. अखेर बच्चू कडू यांनी या चर्चांना पूर्णविराम देत शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला आहे. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी बच्चू कडू यांना उमेदवारी मिळणार असल्याच्या जोरदार चर्चा गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात रंगू लागल्या होत्या. यासाठी बच्चू कडू प्रहार संघटनादेखील शिवसेनेत विलीन करणार असल्याचं बोललं जात होतं. यासंदर्भात बच्चू कडूंनी आज सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना नेमकी भूमिका स्पष्ट केली. यानंतर दुपारी त्यांनी अधिकृत पक्षप्रवेश केला.
यावेळी बच्चू कडूंनी आपण आता पुढची १५-२० वर्षं जे काही राजकारण असेल, ते शिवसेनेतच राहील, असंही स्पष्ट केलं. यावेळी एकनाथ शिंदेंनी बच्चू कडूंच्या विधानपरिषद उमेदवारीचीही घोषणा केली. आपण पक्षप्रवेशासाठी ठेवलेल्या सर्व अटी एकनाथ शिंदेंनी मान्य केल्याचं यावेळी बच्चू कडू म्हणाले. “शिवसेनेचा धनुष्यबाण मी हाती घेत आहे. काल-परवा याबद्दल बरीच चर्चा झाली आहे. आमचे सगळे मुद्दे शिवसेनेनं स्वीकारले आहेत. हमी भावातील सुधारणा, लाडक्या बहिणींमधल्या विधवा बहिणींचा मुद्दा, दिव्यांगाच्या मंत्रालयाचं बळकटीकरण हे सगळे मुद्दे मान्य झाल्यानंतरच हा निर्णय मी घेत आहे. मी प्रामाणिकपणे काम करत राहीन. शिवसेनेची राजकीय ताकद मजबूत करण्याचं काम आम्ही प्रामाणिकपणे करत राहू. पण त्याबदल्यात आम्हाला शेतकऱ्यांची, दिव्यांगांची ताकद हवी आहे. त्यावर कोणतीही तडजोड होणार नाही. शिंदेंच्या नेतृत्वाखाली दिव्यांग मंत्रालय उभं राहिलं. पण त्याच्या बळकटीकरणासाठी काम झालं पाहिजे”, असं ते म्हणाले.
हे ही वाचा:
प. बंगालमधून ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या ७७ तक्रारी दाखल
अमेरिका इराण युद्धामुळे पाकिस्तानला आले तेलाचे मोठे बिल
विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी
डीपफेक व्हिडीओ बनवून केला कर्ज व्यवहार; व्यावसायिकाची फसवणूक
यानंतर शिवसेनेकडून बच्चू कडू आणि नीलम गोऱ्हे या दोन नावांची घोषणा एकनाथ शिंदेंनी विधानपरिषद निवडणुकीसाठी केली. दरम्यान, संघटनेचे प्रमुखच शिवसेनेत गेल्यामुळे आता प्रहार संघटनादेखील शिवसेनेत विलीन होणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यावर बच्चू कडू यांनी प्रहार संघटनेच्या भवितव्याबाबत स्पष्टीकरण दिलं. “प्रहार सामाजिक संघटना व प्रहार दिव्यांग संघटना कायम राहणार. प्रहार सामाजिक संघटना महाराष्ट्रात राहील. ज्यांना राजकीय काम करायचंय ते शिवसेनेत येतील आणि ज्यांना सामाजिक काम करायचंय ते प्रहार संघटनेत राहतील.







