महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे पण वसई विरार महापालिकेत मात्र काहीतरी विपरीत घडते आहे. या निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरलेल्या १३७ जणांची उमेदवारीच संकटात सापडली आहे, असे बोलले जात आहे.
यातील काही उमदेवारांनी अर्ज भरताना दाखल केलेल्या शपथपत्रावर स्वाक्षरीच केलेली नसल्याचे समोर आले आहे. याविरोधात सामाजिक कार्यकर्त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हे सगळे आरोप निवडणूक आयोगाने फेटाळून लावले आहेत.
हे ही वाचा:
वसई विरार महापालिकेच्या निवडणूकीच्या रिंगणात तब्बल ५४७ उमेदवार आहेत. उमेदवारांनी अर्जाबरोबर प्रतिज्ञापत्र सादर करणे बंधनकारक होते. मात्र यापैकी १३७ उमेदवारांनी शपथपत्रावर स्वाक्षरी केलेली नाही. त्यात भाजपा शिवसेनेचे ६५, उबाठाचे ४० आणि काँग्रेसच्या ४ उमेदवारांचा समावेश आहे. प्रतिज्ञापत्र हा शपथेवर दिलेला दस्तऐवज असतो. सही नसल्यास त्या प्रतिज्ञापत्राला अर्थ नाही. त्यातील मजकुराची सत्यता उमेदवाराने मान्य केलेली नाही, असे कायद्याने गृहीत धरले जाते. त्यामुळे असे प्रतिज्ञापत्र कायद्याच्या दृष्टीने अवैध ठरते, असा आरोप ॲड प्रवीण पाटील यांनी केला आहे.
पालिका आयु्क्त मनोजकुमार सुर्यवंशी यांनी हे आरोप फेटाळले आहेत. प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी नाही अशी तक्रार कुणी केली नव्हती. निवडणूक निर्णय अधिकार्यांनी जेव्हा अर्ज उपलब्ध करून दिले होते तेव्हा कुणी हरकत घेतली नव्हती असे आयुक्तांनी सांगितले. उमेदवारांचे प्रतिज्ञापत्र नोटरी करून सांक्षाकीत करण्यात आले आहे तसेच शपथपत्र निवडणूक निर्णय अधिकार्यांनी स्विकारून नामनिर्देशीत केलेली आहेत आहेत, असेही आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.







