” सर्वसामान्य माणूस प्रचंड गोंधळलेला आहे. कधी शाळा सुरू करतात, तर कधी बंद करतात. कधी परीक्षा ऑनलाइन तर कधी ऑफलाइन घेतात. सर्वजण एकत्र बसून एकमत करून नियमावली जाहीर करा. वडेट्टीवार चंद्रपुरात वेगळं बोलतात, तर टोपे जालन्यात वेगळं बोलतात, अजित पवार यांचं काही वेगळंच म्हणणं असत. रोज नवीन घोषणा करण्यापेक्षा एकच काय ते ठरवून घ्या. लोकांना घाबरवू नका, तज्ज्ञांना विचार घेऊन सल्ले द्या. हे सरकार गेंड्यापेक्षाही जास्त असंवेदनशील झाले. राज्य सरकारकडून सत्यानाश चालला आहे ” अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता राज्य सरकारने शनिवारी नवी नियमावली जाहीर केली आहे. राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर करत राज्यभर निर्बंध अधिक कठोर केले आहेत. राज्यात लागू करण्यात आलेल्या नव्या निर्बंधांनंतर चंद्रकांत पाटील यांनी ही टीका केली आहे.
पाटील म्हणाले, रात्रीचा व्यवसाय, उद्योग चालवणाऱ्यांवर तुम्ही निर्बंध घालत आहात. मात्र निर्बंध लावायचेच असतील तर दिवसा सुरू असणाऱ्या व्यवसाय आणि उद्योगांवरही आणा. मात्र आता जास्त निर्बंध लावून चालणार नाहीत. प्रत्येकाला आपल्या जीवाची काळजी आहे, त्यामुळे सरकारने त्यांना कोणती काळजी घ्यावी हे सांगावे, जास्तीचे निर्बंध लावू नये, असे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं आहे.
हे ही वाचा:
बापरे!! म्हणून त्याने ११ वेळा घेतली कोरोना प्रतिबंधक लस
नाट्यसंगीत गायक पंडित रामदास कामत यांचे निधन
धबधब्यात अचानक काळकडा कोसळला; ७ मृत्युमुखी
‘या’ दिवशी होणार ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
चंद्रकांत पाटलांच्या टीकेतून मुख्यमंत्रीसुद्धा सुटले नाहीत. मुख्यमंत्र्याना संबोधून पाटील म्हणाले की, ” गेल्या दोन वर्षात करोना काळात मैदानात उतरले नाहीत, आता तर त्यांची तब्येत बरी नसल्याने कसे समोर येतील.? राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक घ्यायला हवी, राज्यात पाच पक्ष आहेत, पण तसे दिसत नाही. विरोधी पक्षांना विचारात घेण्याची तसदीही सरकार घेत नाहीत. राज्यात केवळ मनमानी कारभार सुरू आहे. किमान विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना तरी बैठकीत सामील करून घ्यायचे होते. हे अधिकृतपणे शासनाचा भाग आहेत.” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.