24 C
Mumbai
Saturday, January 24, 2026
घरराजकारणविधानसभा अध्यक्षपद निवडणुकीला मुख्यमंत्र्यांकडून ‘रेड सिग्नल’

विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीला मुख्यमंत्र्यांकडून ‘रेड सिग्नल’

Google News Follow

Related

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अजूनही मुहूर्ताची प्रतीक्षा आहे. अध्यक्षपदासाठी वेगवेगळ्या नावांची चर्चा सुरू असली तरी त्या पदाची निवडणूक घेण्यासाठी मात्र अजून महाविकास आघाडीला धीर होत नाही. काँग्रेसमधून अध्यक्षपदासाठी वेगवेगळी नावे पुढे येत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र लिहून तूर्तास निवडणूक घेणे शक्य होणार नाही, असे कळविले आहे. एकप्रकारे या निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या काँग्रेसला हा शह मानला जात आहे. आता ही निवडणूक होण्याची तूर्तास चिन्हे दिसत नाहीत. कोरोनामुळे सध्या ही निवडणूक करणे शक्य नाही. योग्य वेळ येईल तेव्हा निवडणूक घेऊ, असे मुख्यमंत्र्यांनी कळविल्यामुळे काँग्रेसच्या इच्छांवर पाणी फेरले गेले आहे. सध्या नरहरी झिरवळ यांच्याकडे प्रभारी अध्यक्षपद सोपविण्यात आले आहे.

राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसंदर्भात विचारणा केली होती. पण राज्यपालांच्या पत्राला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी १ जुलैच्या आपल्या पत्रात नमूद केले की, ५ जुलैपासून जे अधिवेशन सुरू होत आहे, त्यात विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेणे शक्य होणार नाही. पत्रात असेही नमूद केले आहे की, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक ठराविक मुदतीत घेतली पाहिजे, असे घटनेत म्हटलेले नाही. त्यामुळे निवडणूक पुढे ढकलल्याने घटनेचे उल्लंघन होत नाही.

हे ही वाचा:

महाराष्ट्राच्या राजकारणात नवा जेम्स बॉण्ड?

बला टळणार नाही…मी कुठेही जात नाहीये

पटोलेंचा पत्रव्यवहार, मुख्यमंत्र्यांकडे काँग्रेस मंत्र्याचीच तक्रार

‘पोलिसांच्या बदल्या-पोस्टिंगशी देशमुखांचा संबंध होता’

खरे तर, या निवडणुकीसाठी सर्व सदस्यांना विधिमंडळात उपस्थित राहणे बंधनकारक असते पण कोरोनामुळे ते शक्य होणार नाही. सरकारचीही इच्छा आहे की, ही निवडणूक लवकरात लवकर व्हावी, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी असेही म्हटले आहे की, पाच जिल्हापरिषदांच्या पोटनिवडणुकाही पुढे ढकलण्याचा प्रस्ताव आम्ही निवडणूक आयोगाला दिला आहे. त्यांच्याकडून सकारात्मक उत्तर मिळेल अशी अपेक्षा आहे. याच मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे.

नाना पटोले यांनी ५ फेब्रुवारी २०२१ला अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून विधानसभेत अध्यक्षच नाही. या निवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. काँग्रेसला हे पद मिळणार हे स्पष्ट असले तरी निवडणूक होत नसल्याने सत्तेतले सहकारी पक्ष असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसवर काँग्रेसकडून दबाव आणला जात आहे. मात्र आता मुख्यमंत्र्यांनीच पत्र लिहून निवडणूक घेण्यास असमर्थता दर्शविल्यामुळे शिवसेना काँग्रेसच्या विनंतीकडे फारसे गांभीर्याने पाहात नाही हे स्पष्ट होते आहे. एकीकडे पटोले स्वबळाची भाषाही करत आहेत तसेच मुख्यमंत्र्यांना नुकतेच पत्र लिहून त्यांनी खनीकर्म उद्योगासंदर्भात काही तक्रारी केल्या होत्या. उद्योगखात्याचे मंत्री सुभाष देसाई आहेत. त्यामुळे एकप्रकारे शिवसेनेतही काँग्रेसबद्दल नाराजी आहे. त्याचेच प्रतिबिंब तर उद्धव ठाकरे यांच्या या पत्रात दिसत नाही ना, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

 

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा