मध्य पूर्वेतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगभरात पुरवठा साखळी विस्कळीत झालेली आहे. अशातच जगभरात इंधनाचे दर गगनाला भिडले असताना आणि अनेक देशांमध्ये आणीबाणीची स्थिती असताना, भारताने मात्र आपले इंधन व्यवस्थापन अत्यंत चोख ठेवले आहे. यावरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. तसेच सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या लॉकडाऊनबाबतच्या अफवा त्यांनी फेटाळून लावल्या आहेत.
दरम्यान, सामान्यांना मोठा दिलासा देण्यासाठी म्हणून केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत पेट्रोल डिझेलच्या उत्पादन शुल्कात मोठी कपात केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “जगभरात युद्धाची परिस्थिती असताना इंधन दरवाढीचे संकट उभे ठाकले आहे. अशा कठीण काळात भारत सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात घट करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला, त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार.” पुढे ते म्हणाले की, आपल्या शेजारील देशांमध्ये इंधनाच्या कमतरतेमुळे शाळा, कार्यालये आणि संस्था बंद करण्याची वेळ आली आहे, मात्र भारताने उत्तम व्यवस्थापनामुळे अशी वेळ येऊ दिली नाही.
अशातच सोशल मीडियावर, देशात लॉकडाऊन लागू होणार असल्याची अफवा पसरवली जात आहे. यावरही बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी अफवा पसरवणाऱ्यांना कठोर शब्दात इशारा दिला आहे. अफवा पसरत असल्याने पेट्रोल पंपांवर नागरिकांच्या रांगा लागल्याचे चित्र असताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मध्य पूर्वेतील युद्धामुळे भारताच्या शेजारच्या देशात शटडाऊनची परिस्थिती आली आहे. मात्र, आपल्या केंद्र सरकारने उत्तम व्यवस्था केली आहे. लोकांनी विनाकारण पेट्रोल पंपांवर गर्दी करू नये. आपल्याकडे एक महिना पुरेल एवढा इंधन साठा आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. लॉकडाऊन लागणार नाही, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. याबद्दल खोटी माहिती पुरवणे गुन्हा ठरेल,” असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
हे ही वाचा:
हरदीप पुरींनी केले स्पष्ट, लॉकडाऊनच्या बातम्या अफवा
सामान्यांना मोठा दिलासा! पेट्रोल-डिझेल स्वस्त करण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय
नक्षलवाद संपवण्यासाठी ३१ मार्च २०२६ ची अंतिम मुदत! नक्षलविरोधी कारवाईची काय आहे परिस्थिती?
पश्चिम आशियातील तणावात भारताला दिलासा!
देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला आवाहन केले आहे की, दररोज ज्याप्रमाणे आवश्यक तेवढेच इंधन भरता, तसेच भरावे. कोणत्याही अधिकृत माहितीशिवाय सोशल मीडियावरील अफवांना बळी पडू नये. देशात घरगुती गॅस किंवा पेट्रोल-डिझेलची कोणतीही कमतरता भासणार नाही, याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. लॉकडाउन लागणार नाही हे केंद्रानं जाहीर केलं आहे. जे कोणी अशा अफवा पसरवतील त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल. स्पष्टपणे सांगतो की खोट्या अफवा पसरवू नका नाहीतर फौजदारी कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.







