कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी)चे संस्थापक अभिजीत दिपके याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत, त्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन “सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर” व्हावे, अशा शब्दात मोदींनाच आव्हान दिले. जंतर मंतर येथे झालेल्या आंदोलनानंतर कोक्रॉच जनता पार्टीला हुरूप आल्यानंतर आता आपण कुणाचाही राजीनामा घेऊ शकतो अशी भाषा कोक्रॉच जनता पार्टीने वापरायला सुरुवात केली. नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या निषेधार्थ झालेल्या देशव्यापी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांना उद्देशून पंतप्रधानांनी सोशल मीडियावरून केलेल्या संवादावर त्याने ही टिप्पणी केली.
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्रातील आपल्या गावी परतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दिपके म्हणाला, “माझ्या मते, पंतप्रधान मोदींनी आता इन्फ्लुएन्सर व्हावे. ते ते काम चांगले करत आहेत. त्यांनी पंतप्रधानांची खुर्ची रिकामी करावी आणि देश चालवण्याचे काम दुसऱ्या नेत्याला करू द्यावे.”
आंदोलक विद्यार्थ्यांचा छळ
दिपके याने आरोप केला की, आंदोलन मागे घेतल्यानंतरही विविध राज्यांतील सरकारे आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांचा छळ करत आहेत.
“सीजेपीचे आंदोलन स्थगित झाल्यानंतरही विविध राज्यांतील सरकारे आंदोलक विद्यार्थ्यांचा शोध घेत त्यांना त्रास देत आहेत. सरकारने विद्यार्थ्यांचा छळ तात्काळ थांबवावा. अन्यथा आगामी निवडणुकांमध्ये हेच विद्यार्थी सरकारला धडा शिकवतील,” असे ते म्हणाले.
‘राग अजूनही कायम आहे’
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे लोकांचा संताप कमी झालेला नाही, असा दावा करत दिपके म्हणाले, “केंद्रीय मंत्र्यांच्या राजीनाम्यामुळे आंदोलकांचा राग संपलेला नाही. हा राग सरकारविरोधात आहे. भाजपला तरुणांचा संताप अजूनही समजलेला नाही.”
हे ही वाचा:
पाकिस्तानात पोलिस चौकीवर झालेल्या हल्ल्यात नऊ पोलिसांचा मृत्यू
“भाजपमध्ये या, नाहीतर परिणाम भोगावे लागतील”
पतंजलीची विमा क्षेत्रात दमदार एंट्री
जंतर-मंतर आंदोलन प्रकरणी बलप्रयोगाचे निकष स्पष्ट करण्याचे निर्देश
सरकारने विद्यार्थ्यांना लक्ष्य करणे सुरूच ठेवले, तर आंदोलन आणखी मोठ्या प्रमाणात पुन्हा सुरू करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
“हे विद्यार्थी दहशतवादी नाहीत, ते देशाचे भविष्य आहेत. जर देशाच्या भविष्याशी अशी वागणूक दिली गेली, तर जसे धर्मेंद्र प्रधान यांना पद सोडावे लागले, तसेच उद्या आम्ही सरकारही बदलू. गरज पडली तर पुढील आंदोलन आणखी मोठ्या प्रमाणावर होईल,” असे दिपके म्हणाला.
पॅलेट गन वापराच्या चौकशीची मागणी
जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर पॅलेट गन वापरण्याचे आदेश देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्याने केली.
“अमित शाह असोत किंवा इतर कोणीही, विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवण्याचे आदेश देणाऱ्या व्यक्तीवर कारवाई झालीच पाहिजे,” असे त्याने म्हटले.
जल्लोषावरून झालेल्या टीकेला उत्तर
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सीजेपी समर्थकांनी केलेल्या जल्लोषावरून झालेल्या टीकेलाही दिपके याने उत्तर दिले.
“आमचे स्वयंसेवक ३६ दिवस कडक उन्हात आणि पावसात आंदोलन करत बसले होते. एवढा मोठा विजय मिळाल्यानंतर त्यांनी आनंद साजरा करण्यात काय चुकीचे आहे? भाजप निवडणुका जिंकल्यानंतर काय करतो? आमच्या स्वयंसेवकांनी भाजपप्रमाणे रस्ते अडवले नव्हते,” असे ते म्हणाले.
धर्मेंद्र प्रधान यांच्या सत्कारावर प्रश्न
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर संसदेत त्यांचा सत्कार करण्यात आल्याबद्दलही दिपकेने भाजपवर टीका केली.
“विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यानंतरही संसदेत धर्मेंद्र प्रधान यांचा सत्कार करताना भाजपला लाज वाटली नाही का?” असा सवाल त्याने केला.
फास्ट-ट्रॅक न्यायालयांबाबत सरकारवर टीका
प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणांवर फास्ट-ट्रॅक न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या घोषणेवरही त्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
“तीन दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी पेपर लीक प्रकरणांसाठी फास्ट-ट्रॅक न्यायालयांची घोषणा केली. लोकांना आनंद झाला. पण झाले काय? पहिल्याच सुनावणीत सीबीआयचे वकील हजर नसल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली,” असे दिपके म्हणाला.
कंगना रणौतना प्रत्युत्तर
सीजेपीच्या आंदोलनावर टीका करणाऱ्या भाजप खासदार कंगना रणौत यांच्या वक्तव्यालाही दिपके यांनी उत्तर दिले.
“मी केवळ गंभीर राजकारण्यांच्या वक्तव्यांवरच प्रतिक्रिया देतो. कंगना रणौत या अर्धवेळ राजकारणी आहेत. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यावर भाष्य करण्याची मला गरज वाटत नाही,” असे त्यांनी सांगितले.







