पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिपब्लिक समिट २०२६ मध्ये आपल्या भाषणाने सर्वांचीच मने जिंकली. भारताच्या होत असलेल्या विकासात अडथळे आणणाऱ्यांवर त्यांनी मिश्किल भाषेत टिप्पणी करत ताशेरेही ओढले. “ग्रेट पॉवर इंडिया : नेशन फर्स्ट” या विषयावर बोलताना पंतप्रधान म्हणाले की, त्यांच्या सरकारच्या कामकाजाच्या गतीमुळे देशातील जनतेच्या अपेक्षांमध्ये मोठा बदल झाला आहे.
ते म्हणाले, “आमच्या सरकारच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे लोकांच्या आकांक्षा वाढल्या आहेत. एक मागणी पूर्ण झाली की लगेच लोक अधिक चांगल्या आणि प्रगत सुविधेची अपेक्षा करतात. पूर्वी नवीन रस्त्याची मागणी असे, रस्ता झाला की पुढचा प्रश्न असतो – मेट्रो कधी येणार? पूर्वी लोकांची अपेक्षा होती की रेल्वे वेळेवर यावी आणि स्वच्छ आसने मिळावीत. आज लोक विचारतात – आमच्या मार्गावर वंदे भारत का नाही?”
पंतप्रधानांनी असेही म्हटले की विरोधी पक्षसुद्धा सरकारच्या कामगिरीवर विश्वास ठेवतात. “काही जण याला असंतोष समजतात, पण हे असंतोष नाही तर आकांक्षा आहेत. काँग्रेस पक्षसुद्धा सतत म्हणतो – मोदीजी हे करा, ते करा. त्यांनाही विश्वास आहे की हे काम जर कोणी करू शकते तर हे सरकार करू शकते.”
त्यानंतर पंतप्रधानांनी “महत्त्वाकांक्षी भारत” आणि “सतत विरोध करणारे लोक” यांच्यातील फरक स्पष्ट केला.
ते म्हणाले, “एका बाजूला देशातील मोठा वर्ग महत्त्वाकांक्षी आहे. दुसऱ्या बाजूला एक असा राजकीय गट आहे ज्यांचा जीवनमंत्रच ‘नेहमी विरोध’ असा झाला आहे. हा गट कायम असमाधानी असतो.”
त्यांनी काही उदाहरणे देत सांगितले, “हे लोक म्हणतात की २४ तास वीज का नाही? पण दुसऱ्या दिवशी धरणे, सौर ऊर्जा प्रकल्प, औष्णिक वीज प्रकल्प किंवा अणुऊर्जा प्रकल्प यांच्याविरोधात आंदोलन करतात.”
हे ही वाचा:
व्हॉट्सअॅपची कमान आता भारतीयाच्या हाती!
दुर्मिळ खनिजांसाठी भारताची मोठी रणनीती
विधवांना लग्नाच्या बेडीत अडकवणाऱ्या नराधमाला बेड्या
ऑपरेशन टायगर फत्ते! ठाकरेंचे सहा खासदार शिवसेनेत
पंतप्रधानांनी पुढे म्हटले, “हेच लोक पूर्वी खनिज उत्खननाला विरोध करत होते. पण आता विचारतात की भारताकडे दुर्मिळ खनिजांचा साठा आणि पुरवठा साखळी का नाही? भारतात इतर देशांसारखी इलेक्ट्रिक वाहन व्यवस्था का नाही? पूर्वी हेच लोक ‘डेटा विरुद्ध आटा (पीठ)’ अशी चर्चा करत होते, आणि आता विचारतात की कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) क्षेत्रात भारताने काय केले?”
राष्ट्रीय सुरक्षा आणि प्रशासनाचा उल्लेख करताना त्यांनी तरुणांना अशा गटांची ओळख पटवण्याचे आवाहन केले. “देशाने त्यांचा स्वभाव समजून घेणे आवश्यक आहे. विशेषतः तरुणांनी आणि जनरेशन झी ने त्यांना लवकर ओळखले पाहिजे. अन्यथा, जसे मी म्हणतो – ‘सूर्यवंशी आला आहे’ आणि तो गोष्टी लगेच स्पष्ट करून सांगतो.” वैभव सूर्यवंशीच्या तडाखेबंद खेळीचा संदर्भ त्यामागे होता.
या संदर्भात पंतप्रधानांनी “सूर्यवंश” या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेचा उल्लेख केला. त्यांच्या मते, सत्य शेवटी वेगाने आणि स्पष्टपणे समोर येते आणि विरोधाभासी युक्तिवाद टिकू शकत नाहीत. भाषणाच्या शेवटी त्यांनी काँग्रेसवर टीका करत म्हटले, “दुर्दैवाने आज प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस अशा घटकांच्या ताब्यात गेला आहे. गांधीजींच्या काळातील ‘राष्ट्र प्रथम’ बोलणारी काँग्रेस पुन्हा दिसेल अशी कल्पना करणे हे आता केवळ एक खोटे स्वप्न आहे.”







