पुद्दुचेरीच्या माजी राज्यपाल आणि भारतातील पहिल्या महिला आयपीएस अधिकारी किरण बेदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेबाबत झालेल्या हलगर्जीपणावर सडकून टीका केली आहे. हा पंतप्रधानांवर छुपा हल्ला करण्याचाच प्रकार होता, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
पंजाबमधील फिरोजपूर दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्याला अडविण्यात आले. त्याबाबत बेदी यांना विचारण्यात आल्यावर त्या म्हणाल्या की, या संपूर्ण प्रकरणात पंजाबचे पोलिस महासंचालक कुठेही दिसले नाहीत. ते पंतप्रधानांच्या या ताफ्यासोबत नव्हते. राज्याचे गृहमंत्री आणि गृहसचिवही तिथे उपस्थित नव्हते. जिल्हाधिकारीही गायब होते. हा एक कटच होता की काय? त्यामुळे हे एका छुप्या हल्ल्याचे कारस्थान होते असा संशय घ्यायला जागा आहे.
फिरोजपूरला जात असताना पंतप्रधानांचा ताफा १५ ते २० मिनिटे उड्डाणपुलावर थांबवला होता. त्यानंतर पुढे जाणे शक्य नसल्याने तो मागे फिरविण्यात आला आणि भटिंडा विमानतळावर नेण्यात आला.
बेदी यांनी पंजाबच्या पोलिस अधिकाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या, राज्य सरकारच्या पोलिस यंत्रणेच्या परवानगीशिवाय पंतप्रधानांचा ताफा पुढे सरकू शकत नाही. पण मग कुठे होते पोलिस अधिकारी. कुठे होते डीजीपी. कुठे होते, मुख्य सचिव, स्वतःला वाचविण्यासाठी ते तिथे अनुपस्थित होते का? त्यांना काही माहिती होती का, की इथे काही घडणार आहे? मग हे अधिकारी असतात कशाला? मोठे मिरवत असतात. पण प्रत्यक्ष वेळ आली तेव्हा हे गैरहजर होते. म्हणजेच हे भित्रे, पळपुटे होते. त्यांना काही माहिती कळली होती की नाही हे माहीत नाही. पण कळली असेल तर त्यांनी ते जाहीर करायला हवे होते. ही यूपीएससीची सेवा ही कर्मयोग्यांची सेवा आहे. भित्र्यांची नाही.
हे ही वाचा:
पंजाब सरकारची चूक स्पष्ट; डीजीपीची हकालपट्टी
जॉर्ज फ्लॉइडच्या भाचीवर गोळीबार
पाकिस्तानला गेलेले ते ३ कॉल कोणाचे?
गोव्यात आणि उत्तर प्रदेशमध्ये शिवसेना करणार महाविकास आघाडीचा प्रयोग
बेदी म्हणाल्या की, जर या अधिकाऱ्यांना काही माहिती असेल तर ती त्यांनी जाहीर करायला हवी होती किंवा स्वतःची चूक झाल्याचे कबूल करायला हवे होते अथवा कुणी त्यांना तसे करायला सांगितले ते जाहीर करायला हवे. पंतप्रधानांकडून कारस्थानाबद्दल शंका उपस्थित केली जातेच आहे, पण मलाही वाटते की, पंतप्रधानांची हत्या करण्याचाच हा प्रयत्न होता. पण देश आज वाचला आहे.