मंगळवारी अहिल्यानगरच्या चौंडीत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त फडणवीस सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. या ऐतिहासिक कॅबिनेट मिटिंगची चर्चा गेले अनेक दिवस सुरू होती.
यात पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या जीवनचरित्रावर एक भव्य चित्रपट शासनाच्या माध्यमातून निर्माण करण्यात येणारा आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट फक्त मराठी नव्हे तर विविध भाषेत तयार केला जाईल, अशी घोषणा करण्यात आली.
अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे जिल्ह्यातील नागरिकांसाठी उच्च दर्जाच्या वैद्यकीय शिक्षणाची सोय होणार आहे. या निमित्ताने विविध आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहे.
यशवंत विद्यार्थी योजना
‘यशवंत विद्यार्थी योजना’ ही योजना धनगर समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सुरू करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत १०,००० विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वसतिगृहाची निर्मितीही केली जाणार आहे.
आदिशक्ती अभियान
मुलींसाठी अहिल्यानगरमध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) स्थापन करण्याचा निर्णयही घेण्यात आला. महिलांच्या आर्थिक, सामाजिक आणि आरोग्यविषयक समस्यांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘आदिशक्ती अभियान’ राबविण्याचे ठरविण्यात आले. महिला आणि संस्थांना ‘आदिशक्ती पुरस्कार’ प्रदान केले जाणार आहेत.
हे ही वाचा:
भारत-पाकिस्तान युद्ध झालं तर माधुरी दीक्षित माझी!
युद्धजन्य परिस्थितीत काय करावे? ३३ राज्यांत होणार मॉक ड्रील
राज्यातील प्रमुख मंदिरांच्या जीर्णोद्धार आणि विकासासाठी तब्बल ५,५०३ कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. यामध्ये खालील प्रकल्पांचा समावेश आहे:
- त्र्यंबकेश्वर विकास: २७५ कोटी रुपये
- श्री क्षेत्र महालक्ष्मी मंदिर विकास: १,४४५ कोटी रुपये
- श्री क्षेत्र माहुरगड विकास: ८२९ कोटी रुपये
- श्री क्षेत्र तुळजा भवानी मंदिर विकास: १,८६५ कोटी रुपये
- श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिर विकास: २५९ कोटी रुपये
- अष्टविनायक गणपती मंदिरांचा जीर्णोद्धार: १४७ कोटी रुपये