‘आधी उपोषण होऊ द्या, लाठीचार्ज होऊ द्या, मग मी राजीनामा देईन’

पोलिस भरती घोटाळ्याबाबत प्रियांक खर्गे यांचे वादग्रस्त विधान

‘आधी उपोषण होऊ द्या, लाठीचार्ज होऊ द्या, मग मी राजीनामा देईन’

कर्नाटकातील नागरी पोलीस शिपाई भरती परीक्षेतील कथित अनियमिततेवरून राजकीय वातावरण तापले आहे. परीक्षा प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या उमेदवारांच्या आंदोलनाबाबत कर्नाटकचे गृहमंत्री प्रियांक खर्गे यांनी केलेल्या ‘लाठीचार्ज’च्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर विरोधक आणि परीक्षार्थींकडून जोरदार टीका होत आहे.

प्रियांक खर्गे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना खर्गे म्हणाले, “हो, मी राजीनामा देईन. आधी त्यांना २५ दिवस उपोषण करू द्या. त्यानंतरही त्यांनी नियंत्रण ठेवले नाही, तर आम्ही लाठीचार्ज करू आणि मग मी राजीनामा देईन.”

खर्गे यांच्या या वक्तव्यामुळे वाद आणखी चिघळला आहे. भरती प्रक्रियेतील त्रुटींविरोधात आवाज उठवणाऱ्या तरुणांशी सरकारने संवेदनशीलतेने संवाद साधण्याऐवजी लाठीचार्जची भाषा केली, असा आरोप विरोधकांनी केला आहे.

हे ही वाचा:

डॉलरची घसरण अन् मौल्यवान धातूंना बूस्ट

चिन्मय कृष्ण दास यांना दोन प्रकरणांत जामीन; तुरुंगातून सुटकेची शक्यता नाही

पाकव्याप्त काश्मीरमधील वार्तांकनानंतर ‘अल जझीरा’ची अडवणूक

मोदींच्या व्हीडिओने गेमच फिरवला

विजयपुरात शेकडो उमेदवारांचा परीक्षेवर बहिष्कार

हा वाद विजयपुरा जिल्ह्यातील टिकोटा येथील शारदांबा पीयू महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर झालेल्या आंदोलनानंतर निर्माण झाला. येथे शेकडो उमेदवारांनी लेखी परीक्षेवर बहिष्कार टाकला. प्रश्नपत्रिका सुमारे ३० मिनिटे उशिरा मिळाल्याचा आरोप उमेदवारांनी केला.

याशिवाय वेगवेगळ्या वर्गांमध्ये प्रश्नपत्रिका आणि ओएमआर उत्तरपत्रिका वाटपाची पद्धत वेगवेगळी होती, असा दावा काही परीक्षार्थींनी केला. या कथित अनियमिततेमुळे परीक्षेत समान संधी मिळाली नाही, असा आरोप करत काही उमेदवार परीक्षा केंद्रातून बाहेर पडले आणि पुनर्परीक्षेची मागणी केली.

अनेक वर्षांच्या तयारीवर परिणाम 

पोलीस भरतीसाठी अनेक वर्षे तयारी करणाऱ्या उमेदवारांनी परीक्षेतील कथित गोंधळामुळे त्यांचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. उमेदवारांच्या म्हणण्यानुसार, प्रश्नपत्रिका उशिरा मिळणे आणि वेगवेगळ्या वर्गांमध्ये परीक्षा प्रक्रियेत फरक असणे यामुळे काही परीक्षार्थींना अतिरिक्त वेळ किंवा समान परिस्थिती मिळाली नाही.

३,९९१ पदांसाठी परीक्षा; साडेचार लाखांहून अधिक उमेदवार

कर्नाटकात ३,९९१ नागरी पोलीस शिपाई पदांच्या भरतीसाठी लेखी परीक्षा घेण्यात आली. राज्यातील ८०० हून अधिक परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. सुमारे ४.५४ लाख उमेदवारांनी परीक्षा दिल्याचे सांगण्यात आले.काही इतर परीक्षा केंद्रांवरही अशाच स्वरूपाच्या तक्रारी समोर आल्याचे वृत्त आहे. मात्र, प्रशासनाने या तक्रारींचे प्रमाण मर्यादित असल्याचे म्हटले आहे.

भाजपकडून प्रियांक खरगे यांच्या राजीनाम्याची मागणी

कर्नाटक विधानसभेतील विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी काँग्रेस सरकारवर प्रशासकीय अपयशाचा आरोप केला. त्यांनी प्रियांक खर्गे यांच्या राजीनाम्याची मागणी करत संबंधित परीक्षा केंद्रावरील परीक्षा रद्द करून पुनर्परीक्षा घेण्याची मागणी केली. याशिवाय संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. हावेरी आणि हसन येथूनही परीक्षेतील कथित अनियमिततेच्या तक्रारी आल्याचा दावा आर. अशोक यांनी केला.

Exit mobile version