आगामी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कोलकाता येथे सत्ताधारी तृणमूल काँग्रेस सरकारविरोधात भाजपचे ‘आरोपपत्र’ प्रसिद्ध केले आहे. भाजपने या आरोपपत्राला ‘अभियोजना’ असे नाव दिले आहे. यावेळी अमित शाहांनी ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला केला.
केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी पश्चिम बंगाल सरकारविरोधात आरोपांचे आरोपपत्र दाखल केले आहे. ममता बॅनर्जी सरकारवर हल्लाबोल करताना ते म्हणाले की, हे सरकार नेहमीच स्वतःला पीडित म्हणून दाखवते. निवडणूक आयोगाला बदनाम करणे हाच त्यांचा एकमेव उद्देश आहे. देशात फक्त एकच राज्य आहे जिथे घुसखोरीला परवानगी दिली जाते, असा टोला त्यानी लगावला. बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या राजवटीत भीतीचे राजकारण, भ्रष्टाचार आणि भेदभाव बळावला आहे.
ममता बॅनर्जी सरकारवर हल्लाबोल करताना अमित शाह म्हणाले की, “बंगाल अराजकतेला बळी पडले आहे.” त्यांनी आरोप केला की, ममता बॅनर्जी सरकारने बंगालला घुसखोर, गुन्हेगार आणि भ्रष्टाचारी लोकांसाठी आश्रयस्थान बनवले आहे, ज्यामुळे राज्य अनेक दशके मागे गेले आहे. ते म्हणाले की, टीएमसीच्या राजवटीने राज्याला अराजकता, महिलांची असुरक्षितता आणि भ्रष्टाचाराच्या दलदलीत ढकलले आहे. गेल्या १५ वर्षांपासून भीती, भ्रष्टाचार आणि भेदभावाचे राजकारण चालले आहे. त्यांचे राजकारण खोटेपणा, भीती आणि हिंसाचारावर आधारित आहे. सर्वसाधारणपणे, सरकारे लोककल्याणकारी कामांच्या आधारावर निवडली जातात, परंतु टीएमसीचे राजकारण भीती आणि धमक्यांवर आधारित राहिले आहे. भाजप २०११ पासून याच्या विरोधात लढत आहे आणि मला खात्री आहे की यावेळी बंगालची जनता भाजपला पूर्ण बहुमत देईल.”
हे ही वाचा:
“मोजतबा खामेनी, मरण पावलेत किंवा त्यांची प्रकृती गंभीर”
हरीश राणा यांच्या निधनानंतर इच्छामृत्यूसाठी मुंबई महानगरपालिकेकडे ७५ अर्ज
“भारताच्या जनतेचे आभार”; इस्रायलवर डागलेल्या क्षेपणास्त्रांवर इराणने का लिहिला संदेश?
लष्कराची ताकद वाढणार; २.२८ लाख कोटींच्या संरक्षण उपकरण खरेदीला मंजुरी
अमित शाह म्हणाले की, पश्चिम बंगाल हे एकमेव राज्य आहे, जिथून घुसखोर भारतात प्रवेश करून देशभरात अशांतता निर्माण करत आहेत. पश्चिम बंगालच्या सीमेतून होणारी घुसखोरी ही राष्ट्रीय सुरक्षेची चिंतेची बाब आहे. पुढे ते म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये गेल्या १५ वर्षांपासून भीती, भ्रष्टाचार आणि लांगुलचालनाचे राजकारण प्रचलित आहे. भाजपच्या ‘आरोपपत्रा’तून तृणमूल काँग्रेसचा गैरकारभार, सिंडिकेट राजवट आणि सत्ताधारी पक्षाने बंगालला भ्रष्टाचाराची प्रयोगशाळा कशी बनवली आहे, हे अधोरेखित होते. ही विधानसभा निवडणूक पश्चिम बंगालला घुसखोरांपासून मुक्त करण्याची आहे. ममता बॅनर्जी स्वतःला पीडित म्हणून भासवण्याचा डाव खेळत आहेत, हे पश्चिम बंगालच्या जनतेने ओळखले आहे.







